Sangli News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय आदेश रद्द झाल्याचे सांगून दोन दिवसात मुंबईमध्ये बैठकीसाठी आमंत्रित केल्याने वारणा धरणग्रस्तांचे आंदोलन (Warna dam victims and Chandoli sanctuary project victims) तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर वारणा धरणग्रस्तांचे आंदोलन स्थगित करण्यात आलं असलं, तरी आजपासून काम दिसलं नाही तर 30 तारखेला पुन्हा येऊन बसणार असल्याचा इशारा गौरव नायकवडी यांनी दिला आहे. 


लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित


आजपासून जमिनी पाहण्याचा कार्यक्रम लावणे तसेच ज्या लोकांना जमिनी नको आहेत त्यांना स्थानिक बाजारभावाप्रमाणे रक्कम देणे, तसेच सर्व धरणग्रस्तांचे खाती संकलन करणे, ज्या लोकांना अद्याप उतारे मिळाले नाहीत त्यांना त्वरित देणे, यासारखे महत्वाचे विषय मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केल्याचे वारणा धरण प्रकल्प आणि अभयारण्यग्रस्त संघटनेचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी जाहीर केले. 


यावेळी प्रांत अधिकारी संपत खिलारी यांच्या हस्ते येलूर येथील 55 शेतकऱ्यांना उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. "आजपासून गावोगावी जाऊन धरणग्रस्तांची माहिती घेऊन येत्या 30 तारखेपर्यंत आमच्या सर्व मागण्याची पूर्तता करा, आम्ही आंदोलन थांबवत नसून तात्पुरते स्थगित करत आहोत. आजपासून काम दिसले नाही, तर 30 तारखेला पुन्हा येऊन बसणार," असा इशारा देत धरणग्रस्तांच्या आंदोलनाला तूर्तास विराम देत असल्याचे गौरव नायकवडी यांनी जाहीर केले. (Warna dam victims and Chandoli sanctuary project victims)


तहसील कार्यालयाचे गेट तोडून कार्यालयाचा कब्जा 


दरम्यान, इस्लामपूर तहसील कार्यालय परिसरात हजारो धरणग्रस्तांनी सोमवारपासून (16 जानेवारी) गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केले होते. धरणग्रस्तांचे आंदोलन संबंधित अधिकारी व तहसीलदार व प्रांत अधिकारी मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी (17 जानेवारी) तहसील कार्यालयाचे गेट तोडून कार्यालयाचा कब्जा घेतला होता. तसेच या आंदोलनाला खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख,माजी मंत्री सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक तसेच अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला होता. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी (18 जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात यशस्वी बैठक पार पडली. 


गेल्या 40 वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी 161 मोर्चे काढून प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश सुरु आहे. कब्जेपट्टीच्या नोटीसा मागे घ्याव्यात यासह इतर मागण्यासाठी धरणग्रस्त संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे.


इतर महत्वाच्या बातम्या