सांगली : ऊस (Sugarcane) आळसाचे पीक झालं आहे. एकदा लागवड करायची, मग कारखान्याला पाठवतानाच लक्ष द्यायचे. एरवी जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसायचे. यामुळे शेताचा पोत बिघडतो, क्षारपड होते, याकडे लक्ष देण्याची आता गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सांगली जिल्ह्यातील कवठेएकंद (ता. तासगाव) येथे केले. सरकारने वीज फुकट देण्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे आता पंप बंद करायला कोण जाईल का? सरकारने दिलेल्या सवलतीचा गैरवापर करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो, मात्र, शेतीच्या गुणवत्तेकडे लक्ष नाही


तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यक्रमात बोलतांना ते बोलत होते. यावेळी आ. सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यावेळी शरद पवार म्हणाले की, एकदा ऊसाची लागवड केली की नंतर थेट ऊस कारखानाला घालवायलाच शेतकरी उसाकडे लक्ष देतो आणि जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो. मात्र, शेतीच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाही. शेतीची उत्पादकता टिकवण्यासाठी जमिनीतचा पोत सुधारण्याचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी हाती घेतला पाहिजे. 


शेतकऱ्यांच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांती आणेल


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जगभर झपाट्याने प्रसारित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर सर्वप्रथम राज्याच्या ऊस शेतीत होत आहे. या तंत्राचा वापर पुढे सर्व पिकांमध्ये होणार असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येईल. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे हे संशोधन देशाच्या कृषी क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असा विश्‍वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता.


ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रावर आधारित हवामान बदलास सक्षमपणे तोंड देणाऱ्या प्रकल्पाचा प्रारंभ पुण्यात झाला. त्यावेळी पवार बोलत होते. ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व बारामतीमधील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या तीन प्रख्यात संस्थांनी हा प्रकल्प तयार केला आहे. तीन वर्षे बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात चाचण्या घेतल्यानंतर आता एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रयोग राबविला जात आहे. ते म्हणाले की, राज्यात ऊस महत्त्वाचे पीक असल्याने तेच या प्रकल्पासाठी प्रथम घेतले गेले. या पिकाच्या काही समस्या आहे. सतत अतिरिक्त पाणी व खतांचा वापर ऊस शेतीत केला जात आहे. त्यामुळे समस्या उद्‍भवल्या आहेत. उत्पादकता व साखर उतारादेखील कमी होतो आहे. परंतु आता ऊस शेतीमधील या समस्यांची सोडवणूक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राद्वारे होऊ शकेल.


इतर महत्वाच्या बातम्या