सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) जत पाण्याच्या मागणीवरुन पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. रक्त घ्या आणि पाणी द्या, अशी मागणी घेऊन दुष्काळग्रस्तांनी आज (1 फेब्रुवारी) थेट रस्त्यावर रक्तदान आंदोलन केलं. सांगलीच्या जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावच्या दुष्काळग्रस्तांनी बालगाव येथे रस्ता रोको करत रक्तदान केले. 


विविध मागण्यांसाठी बालगाव येथे थेट रस्ता रोको आंदोलन


जत तालुक्यातील 65 गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे. ऐन हिवाळ्यामध्ये जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीच्या,जनावरांचा आणि नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात येत असल्याचा आरोप करत तातडीने म्हैसाळ सिंचन योजनेतून गुड्डापूरसह इतर तलाव भरून द्यावे, या  विविध मागण्यांसाठी बालगाव येथे थेट रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


रक्तदान करत, रक्त घ्या आणि पाणी द्या, अशी मागणी


तसेच, या ठिकाणी दुष्काळग्रस्तांनी रक्तदान करत, रक्त घ्या आणि पाणी द्या, अशी मागणी केली आहे. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात जत तालुक्यातील भाजप नेत्यांसह पाणी संघर्ष समितीच्या नेत्यांनी देखील सहभागी घेतला होता. तसेच पाण्याच्या प्रश्न न सोडवल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर 65 गावांकडून बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या