Sangli Crime : जमीन दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून घेत सांगलीतील एका शासकीय कंत्राटदाराचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. माणिकराव विठ्ठल पाटील असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्याच मोटारीतून अपहरण झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. माणिकराव यांचा मुलगा विक्रमसिंह यांनी याबाबत सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. 


13 ऑगस्ट रोजी तुंग येथे ही घटना घडली. जमीन दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून घेत अपहरण केल्याचे समजते. माणिकराव पाटील शासकीय कंत्राटदार आहेत. 13 ऑगस्ट रोजी रात्री ते तुंग येथे त्यांच्या मोटारीतून गेले होते. रात्री साडेआठ ते पाऊणेनऊच्या सुमारास गाडीसह अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. बराच वेळ ते न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता ते कोठेही आढळून आले नाहीत. 


मुलगा विक्रमसिंह पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यात एका ठिकाणाहून आलिशान मोटार जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु ठेवला आहे. कुटूबीयांनी माणिकराव यांचा कोणाशीही वाद नव्हता किंवा त्यांना इतर अडचणी नसल्याचे सांगितल्याने अपहरण कुणी आणि कशासाठी केलेय याचा कुटुंबाला देखील अंदाज आलेला नाही. 


पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर सुरुवातीला माणिकराव यांची जयसिंगपूरजवळ सीसीटिव्हीमध्ये मोटार दिसून आली होती. त्यानंतर पुढे  कोंडीग्रेजवळ त्यांची मोटार बेवारस स्थितीत आढळल्याने माणिकराव यांच्या बाबतीतचे गुढ वाढले आहे. पोलिसांनी आता अपहरण झालेल्या पाटील यांच्यासह कुटूंबिय आणि इतरांच्या कॉल डिटेल्स घेऊन तपास सुरु ठेवला आहे. सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.


इतर महत्वाच्या बातम्या