Maharashtra Politics Udayanraje Bhosale: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी असल्याचा हल्लाबोल खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. 


खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज किल्ले रायगड येथे  निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. प्रत्येक जाती, धर्माचा सन्मान करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच, शिवरायांचा अपमान सुरू असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यपालांच्या वक्तव्यावर राज्यातील नेते शांत का बसलेत असा सवालही त्यांनी केला. 


राज्यामध्ये राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. राज्यपालाचे नाव घेऊन त्यांना मोठ करायचे नाही. पद मोठं आहे पण व्यक्ती नाही असा टोला ही राज्यपाल कोश्यारी यांना लगावला. शिवाजी महाराजांच्या अपमानावर कोणतीही भूमिका न घेणाऱ्यांवर उदयनराजे यांनी टीकास्त्र सोडले. स्वत: च्या स्वार्थासाठी राजकीय मंडळींकडून त्यावर पांघारून घालण्याचे काम सुरू असून त्यांना लाज वाटली पाहिजे असा हल्लाबोल उदयनराजे यांनी केला. फक्त शिवाजी महाराज यांचाच नाही तर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हा आपला अपमान आहे, असं वाटत नाही, का असा सवाल त्यांनी केला. देश हा विकृतांच्या तावडीत गेला असल्याचे सांगत त्याची खंत वाटत असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. 


दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून देखील राज्यपालांवर कोणतीही कारवाई झाली नाही, यावरून खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी संताप व्यक्त केला होता. युगपुरुषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी तसे कायदे केले पाहिजे. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे  भोसले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली होती. 


Udyanraje Full Speech: पाहा- उदयनराजे भोसले यांचे किल्ले रायगड येथील मेळाव्यातील भाषण