रायगड : पावसाळ्यात बाहेर फिरायला जाताना सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, पण गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्यासाठी किंवा पावसाळी पिकनिकच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तरुणाई बेधुंद होते. पुणे, रायगड, सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात पर्यटनस्थळी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यातच, दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरू असून नदी, ओढ्यांना पाणी आलं आहे.  रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे याच पाण्यातून मार्ग काढताना एका युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. खोपोलीतील (Khopoli) झेनिथ धबधब्याच्या प्रवाहातून वाहून गेलेली युवती मृतावस्थेत आढळून आली. खोपोलीच्या दत्त मंदिर मठाजवळ धबधब्याचा (Waterfall) प्रचंड मोठा प्रवाह वाहत होता. या प्रवाहातून खोपोलीतील कृष्णा व्हॅली येथील एका कुटुंबातील चौघे जण मार्ग क्रॉस करताना प्रवाहात अडकले होते. याबाबतची माहिती मिळताच रेस्क्यू ऑपेरेशन सुरू करण्यात आले. मात्र, रेस्कू ऑपरेशन सुरू करण्यापूर्वीच पाण्यात अडकलेल्या कुटुंबातील 22 वर्षीय तरुणी वाहून गेली. यावेळी, सोबतच्या नातेवाईकांनी मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.


रायगडमधील या दुर्घटनेत सुदैवाने दोन महिला व एक युवक बचावले आहेत. पण, 22 वर्षीय तरुणी स्वप्नाली ही पाण्यात वाहून गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला. धबधब्याजवळील पाण्यात अडकलेल्या ठिकाणाहून स्वप्नाली 5-6 किलोमीटर पाण्यात वाहत गेली होती. त्यामुळे, रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मदत व बचाव कार्य सुरू केल्यानंतर पेपको कंपनीच्या पुलाजवळ सदर तरुणीचा मृतदेह पथकाला आढळून आला. रेस्कू पथकाने हेल्प फौंडेशन आणि पोलिसांच्या मदतीने 3 तासांच्या आत युवतीला मृतदेह शोधून काढला. दरम्यान, घटनास्थळी खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राउत व इतर पोलीसही उपस्थित होते.


हेही वाचा 


Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या 2030 घरांसाठी 1.34 लाख अर्ज प्राप्त; ऑनलाइन भरणा करण्याची शेवटची संधी