Pune Accident News : लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी निघालेल्या नवरदेवाचं आणि त्याच्या दोन मित्रांचं अपघाती निधन झालं आहे. अक्कलकोट (Akkalkot) गाणगापूर (Ganagapura) रस्त्यावर बुधवारी (8 जून) रात्री उशिरा कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील हिंजवडी (Hinjawadi, Pune) परिसरातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन मित्रांच्या मृत्यूमुळं हिंजवडी परिसरात शोककळा पसरली आहे. 


तीन मित्रांच्या अपघाती निधनामुळं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दिपक सुभाष बुचडे (वय 29), आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय 28), आशुतोष संतोष माने (वय 23) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. याप्रकरणी दीपकचे चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे (वय 41) यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मयत दीपक बुचडे याचं 18 जून रोजी लग्न होणार होतं. त्यामुळे त्याची लग्नपत्रिका देवाच्या द्वारी ठेवण्यासाठी हे तिघे बुधवारी तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोटला निघाले होते. तुळजापुरला पत्रिका ठेवून झाल्यानंतर गाणगापूरला जात असल्याचं दीपक यानं रात्री नऊ वाजता घरी फोन करून सांगितलं. गाणगापूरच्या दिशेनं जात असताना अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. मात्र त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास काळानं घाला घातला आणि तीन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला. लग्नकार्य अवघ्या काही दिवसांवर असताना, असा अपघाती मृत्यू झाल्यानं संपूर्ण हिंजवडी आयटीनगर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :