Nirmala Shubham Nawale : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं आदोलन असणार आहेत. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईकडे निघालाय. मनोज जरांगेंच्या लढ्याला लाखो लोकांनी प्रतिसाद दिलाय. दरम्यान, मनोज जरांगे पुण्यात पोहोचल्यानंतर माजी सरपंच निर्मला नवले यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय . या व्हिडीओमध्ये कारेगावच्या माजी सरपंच आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या निर्मला नवले (Nirmala Shubham Nawale) यांनी देखील भाषण केलेलं पाहायला मिळत आहे. निर्मला नवले (Nirmala Shubham Nawale) यांनी या भाषणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
मुंबईकरांनो गावाकडच्या लोकांची काळजी घ्या, निर्मला नवले यांचं आवाहन
निर्मला नवले (Nirmala Shubham Nawale) म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीने आपल्याला नेहमीच प्रेरणा दिली आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की सुरक्षितपणे मुंबईत पोहोचावे. मुंबईकरांनो, आजवर तुम्ही गावाकडे आलात तेव्हा गावकऱ्यांनी नेहमी तुमचे स्वागत केले, तुमची काळजी घेतली. आता वेळ आली आहे की तुम्हीही गावाची व गावकऱ्यांची तितकीच काळजी घ्यावी. गाव आणि मुंबई हे दोन्ही आपलेच आहेत – दोघांची जबाबदारी आपण सर्वांनी समानरित्या पार पाडूया.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कोणा कोणाचा पाठिंबा?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगेंना पाठिंबा दिला असून ते त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याशिवाय परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव देखील मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी देखील मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या