पुणे : सध्या सगळीकडेच लोकसभेच्या निवडणुकीची रेलचेल (Loksabha Election ) सुरु आहे. त्यात अनेक नेते आपलं नशीब आजमावणार आहे. याच निवडणुकीत अनेक नेते ज्योतीष्यांचादेखील सल्ला घेतात आणि आपली राजकीय वाटचाल ठरवताना दिसतात. मात्र याच ज्योतिष्यांना अंनिसकडून ओपन चॅलेन्ज देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि एकवीस लाख रूपये जिंका, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना केलं आहे.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. अनेक राजकीय नेते देखील या फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे अज्ञानी आणि भाबडया लोकांमध्ये गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे, अशी माहिती अनिसने दिली आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया आणि प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे. यासाठी पाच प्रश्न असणारे आहेत. त्याची अचूक देणं गरजेचं असणार आहे. त्या पाच मधील एक प्रश्न संविस्त असेल. या स्पर्धेसाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत.
अटी नेमक्या कोणत्या आहेत?
1. प्रवेशिका आणि उत्तरे तसेच 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती, महाराष्ट्र' या नावे काढलेला रुपये 5000 (रुपये पाच हजार ) प्रवेशशुल्काचा धनादेश (डी.डी.) सीलबंद पाकीटातून 25 मे 2024 पर्यंत रजिस्टर पोष्टाने खालील पत्त्यावर मिळणे बंधनकारक आहे.
2. प्रवेशिका, प्रश्नावली आणि नियमावलीसाठी राहुल थोरात, व्यवस्थापकीय संपादक अनि वार्तापत्र कार्तिक अपार्टमेंट, एफ- 4, सहारा चौक, संजयनगर, सांगली 416416. फोन नंबर- 0233-2312512 यांचेशी संपर्क करावा.
3. प्रवेशिका आणि प्रश्नावली मधील माहिती स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये अथवा टाईप केलेली असावी.
4. आव्हान प्रक्रियेसाठी निर्णय अधिकारी म्हणून 'तज्ज्ञ परीक्षक समिती' कार्यरत असेल, परीक्षक समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
5. ज्योतिष आव्हान प्रक्रियेसाठीच्या बक्षीसाची रक्कम रुपये एकवीस लाख असेल.
6. एका व्यक्तीची एकच प्रवेशिका स्पर्धेसाठी पात्र असेल,
7. प्रश्नावली शंभर गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला पाच गुण असेल. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना ते उत्तर ज्योतिषाची कोणती पद्धत आणि कशी वापरून काढले याची सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे. या माहितीसाठी अर्धे गुण असतील आणि अर्धे गुण उत्तरासाठी असतील.
8. संख्यात्मक अथवा टक्केवारीतील प्रश्नांसाठीच्या उत्तरामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक संख्या असतील तर आपले उत्तर ग्राहय धरले जाणार नाही. उदा. एखादया पक्षाला 100 ते 120 जागा मिळतील असे न लिहिता, अचूक आकडा 112 असा लिहिलेला असावा.
9. निवडणुकीचे भविष्य वर्तवण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य सहभागी प्रवेशिकाकर्त्याने स्वतः उपलब्ध करावयाचे आहे. १०. शंभर गुण मिळवणारा स्पर्धक बक्षीसास पात्र असेल. एकापेक्षा अधिक स्पर्धकांनी शंभर गुण संपादन केल्यास बक्षीसाची रक्कम समान प्रमाणात विभागून दिली जाईल.
11. आव्हान प्रक्रियेच्या संबंधातील आक्षेप, वाद व हरकतींचे न्यायालयीन कामकाज सांगली न्यायालयाच्या कार्यकक्षेत असेल.
12. उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्यास उत्तर कोणत्या मतदारसंघाशी संबंधित आहे ते उमेदवाराच्या नावापुढे नमुद करावे अन्यथा आपली प्रश्नावली बाद ठरवण्यात येईल
13. या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील निवडणूक निकाल आणि आकडेवारी ग्राहय धरण्यात येईल.
14. भविष्य वर्तवण्यासाठी कोणती पध्दत वापरली, हे प्रवेशिकेत नमूद करणे आवश्यक आहे. अन्यथा आपली प्रश्नावली ग्राहय धरण्यात येणार नाही.
15. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केलेनंतर परीक्षक समितीच्या योग्य त्या तपासणीनंतर आव्हान प्रक्रियेचा निकाल दोन आठवडयात जाहीर करण्यात येईल.
इतर महत्वाची बातमी-