पुणे : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी हात स्वच्छ राहावे यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस सॅनिटायझरच्या मागणीत वाढ झाली आहे. लोकांच्या या गरजेचा गैरफायदा घेत बनावट सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्या तिघांच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.


अजय गांधी, मोहन चौधरी, सुरेश छेडा अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तिन्ही आरोपींनी न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची मागणी वाढत आहेत. या परिस्थिताची गैरफायदा घेत आरोपींनी 1 लाख 2 हजार 419 रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवलं होतं. यासाठी आरोपींनी घरीच कारखाना तयार केला होता. सॅनिटायझर भरण्यासाठी रिकाम्या बाटल्या आणि नामांकित कंपन्यांचे स्टिकर वापरले. त्यासाठी त्यांनी मुंबईतील एका कंपनीतून पाच लिटरचे कॅन आणले आणि त्यातून छोट्या बाटल्या तयार केल्या. त्यानंतर हे सॅनिटायझर पुण्यातल्या लोकल मार्केटमध्ये विकण्यास सुरुवात केली.


मात्र, याबाबत पोलिसांना माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दत्तवाडी परिसरात कारवाई केली आणि तिघांना अटक केली. दरम्यान सॅनिटायझर, मास्कच्या गैरप्रकाराबाबत नागरिकांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरीत पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर कळवावी किंवा 8975283100 व्हॉटस्‌अप क्रमांकावर माहिती पाठवावी, असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.


महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या 31 वर गेली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यापैकी पुण्यात- 10, मुंबई- 5, पनवेल- 1, कल्याण- 1, नवी मुंबई- 1, नागपूर- 4, ठाणे- 1, यवतमाळ- 2, अहमदनगर- 1 रुग्ण आढळले आहेत.


नव्या आकडेवारीनुसार एकूण 99 रुग्ण देशभरात आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्र 31, केरळ 19, हरियाणा 14 (सर्व परदेशी नागरिक), उत्तर प्रदेश 12, दिल्ली 7, कर्नाटक 6, राजस्थान 3, पंजाब 1, जम्मू काश्मीर 1, लडाख 3, तामिळनाडू 1, तेलंगणा 1 यांचा समावेश आहे.


कोरोनाचे देशात दोन बळी


भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. काल दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आता 4, पुण्यात 10, नागपुरात 3 तर ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्यात एकूण 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.


शहरी भागातील शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद


राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असं स्पष्ट करताना परीक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे. राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायिक, यात्रा, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं.

 Corona Effect | कोरोना टाळण्यासाठी शक्य झाल्यास लग्न पुढे ढकला वा नोंदणी विवाह करावा - विभागिय आयुक्त


संंबंधित बातम्या :