पुणे: आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. या दरम्यान मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत आता उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलताना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आत्ताच काही कारण नाही, संख्याबळानंतर याचा विचार होईल. अनेक वेळेला असं घडलं, नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्या असेल तेव्हा निर्णय घ्यायचा असतो, असं म्हणत आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुका झाल्यानंतर निकाल आल्यानंतर जाहीर करू असं म्हटलं आहे, त्यावर पुण्यात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाष्य केलं आहे. 


शरद पवार (Sharad Pawar) बोलले ते बरोबरच आहे, आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय जाहीर करण्याच्या मागणीबाबत आधीच बोलून झालं आहे. जेव्हा मुंबईला मिटींग झाली तिथे कार्यकर्त्यांच्या समोर आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणूनच पुढं जाऊ असं ठरलं आहे, असं नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले आहेत. तर कार्यक्रमाला येण्याबाबत पटोले म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सांगलीतील कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आलं, मात्र इतर ठिकाणी त्यांचा आधीच कार्यक्रम ठरल्याने ते येणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली आहे, असंही यावेळी नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे.


मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार काय म्हणाले?


मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आत्ताच काही कारण नाही, संख्याबळानंतर याचा विचार होईल. अनेक वेळेला असं घडलं, नेतृत्त कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्या असेल तेव्हा निर्णय घ्यायचा असतो. अद्याप कशाचा काही ठरलेलं नाही. बहुमत नाही, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, यात काही शंका नाही, पण आत्ताच काही निर्णय घेण्याची आवश्कता नाही, असंही शरद पवार (Sharad Pawar) यावेळी बोलताना म्हणाले आहेत. 


यावेळी शरद पवारांनी एक उदाहरण देखील सांगितलं आहे, १९७७ साली आणिबाणीच्या नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीला कोणालाही पुढं केलेलं नव्हतं. जयप्रकाश नारायण यांनी सांगितलं, आणिबाणीला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. सर्वजण एकत्र आले, त्यानंतर निवडणुका झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं, निवडणुकीत मत मागताना मोरारजी देसाई यांचं नाव कुठेही जाहीर केलेलं नव्हतं. त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे अशी काही आवश्कता नाही, आम्ही सर्वजण एकत्र बसून लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्याला देऊ असं शरद पवारांनी (Sharad Pawar) यावेळी म्हटलं आहे. 


"राज्यात आमची सत्ता येईल असे चित्र आहे. मात्र याचे नेतृत्त्व कोण करणार यावर अजूनही चर्चा झाली नाही. त्यामुळे आम्ही याचा निर्णय निवडणूक झाल्यानंतर घेणार आहोत, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं आहे. दरम्यान महाविकास आघाडीत एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी आग्रही आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस मात्र याबाबत काहीच बोलत नसल्याचं चित्र आहे.