Pune BJP Congress Rada: गर्दीतून भिरकावलेला दगड आला अन् काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्यात बसला, रक्ताची धार लागली, पुण्यातील काँग्रेस भवनासमोर भाजपचं आक्रमक आंदोलन
Pune BJP Congress Rada: दगडफेकीमध्ये काही कारच्या काचा फुटल्या आहेत, तर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला तो दगड लागल्याने रक्तस्त्राव होत आहे, तो रक्तबंबाळ झाला आहे.

पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपचे पुण्यात आंदोलन सुरू आहे. काँग्रेस भवन बाहेर भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.भाजप कार्यकर्ते काँग्रेसभवन समोर आले आहेत. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा सुरू झाला, गेल्या दोन तासांपासून भाजपकडून आंदोलन सुरू होते. काँग्रेसभवन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे, मात्र पोलिसांनी भाजपला अभय दिलं आहे, भाजपच्या आंदोलनकर्त्यांना संरक्षण दिलं असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी दगडफेकीमध्ये काही कारच्या काचा फुटल्या आहेत, तर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला तो दगड लागल्याने रक्तस्त्राव होत आहे, तो रक्तबंबाळ झाला आहे. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की, त्यांनी देखील दगडफेक केली, त्यांनीच दगड मारून घेतला असावा असंही भाजपच्या आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे. तर दगड मारण्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक करण्यास सुरूवात केल्याचं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. तर यावेळी पोलिसांना देखील दगड लागल्याची माहिती आहे. तर काँग्रेसकडून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंना अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
एका कार्यकर्त्यांना दगड लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला
पुण्यातील काँग्रेस भवन परिसरात हा मोठा राडा झाला आहे. हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जवळपास दीड ते दोन तास आंदोलन केलं. आंदोलकांकडून यावेळी घोषणा बाजी आणि दगडफेक झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी काँग्रेसचे देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते, त्यातील एका कार्यकर्त्यांना दगड लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यावेळी महिला पोलिसांसह काही कारला देखील दगड लागल्याचं दिसून आलं, या सर्व राड्यानंतर आणि काँग्रेस कार्यकर्त्याचं डोकं फुटताच भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनासमोरुन काढता पाय घेतला. त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसून आले.
महिला काॅन्स्टेबलला देखील दगड लागले आहेत, या ठिकाणी वरिष्ठ पोलिस देखील हजर होते, पोलिसांसमोर हे आंदोलन आणि दगडफेक झाली आहे. पुण्याच्या महापौर देखील त्या आंदोलनात होत्या, त्यांनी दगडफेक केली, त्यांना महिलांची काळजी नाही, त्यांना महिलांची सुरक्षा महत्त्वाची नाही, त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलायला आले मात्र त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र दिसून येत आहे. काँग्रेसने भाजप महापौरांना अटक करावी, त्यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी एबीपीला दिलेल्या प्रतिक्रियेवेळी त्यांनी म्हटलं की, फरासखाना पोलिस स्टेशला मांडी घालून बसणार, धीरज घाटे आणि महापौर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही उठणार नाही, आमच्या माणसांची डोकी फोडली आहेत, जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही, त्यांनी टेम्पो भरून दगडं आणली असल्याचा दावा देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
दुर्दैवाने आज सगळ्या गोष्टीला पोलिसांनी खतपाणी घातलं
पुण्याने कायमच या देशाला आणि राज्याला एक चांगली राजकीय आणि सामाजिक संस्कृती दिली, मात्र दुर्दैवाने आज यात संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम पुणे शहर भाजपने केलेला आहे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत हल्ला चढवण्यात आला, आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडण्यात आली, याच्यावर कुठेतरी आज या ठिकाणी पुण्याला काळीमा फासण्याचे काम भाजपच्या लोकांकडून झालेलं आहे, आज काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर झालेला हल्ला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या दगडफेकीचा हल्ला, डोके फोडण्यात आली, याला भाजपा जबाबदार आहे, भाजपने अराजकतेची आणि डोके फोडण्याची संस्कृती पुण्यात आणलेली आहे. याला पुणे शहर पोलीस देखील जबाबदार आहेत, असे आमचे म्हणणे आहे. त्याचं कारणही आहे, एक पुण्यातील मुख्य रस्ता दोन तासापासून भाजपाने अडवून ठेवलेला होता, तरीसुद्धा पोलिसांनी त्यांना हुसकवून लावलं नाही, त्यामुळे त्यांची डेरिंग वाढली, त्यानंतर त्यांनी कार्यालयावर हल्ला करण्यासाठी त्यांची मजल गेली, पोलिसांनी वेळीच ते सगळं थांबवलं असतं, तर असं काही झालं नसतं. आजपर्यंत कधीच आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांनी कुठल्याही कार्यालयावर, दुसऱ्याही पक्षाच्या कार्यालयावर, मोर्चा नेलेला नव्हता कोणत्या नेत्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला नव्हता, दुर्दैवाने आज सगळ्या गोष्टीला पोलिसांनी खतपाणी घातलं असा आमचा थेट आरोप आहे, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
जे घडलं ते निश्चितपणे प्रथा आणि परंपरेला साजेसं नाही
तर भाजप नेते गणेश बिडकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, निश्चितच हा प्रकार पुण्याला साजेसा नाही परंतु काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ज्या प्रकारचा वक्तव्य केलं ते राज्यातील राजकारण पेटवणारे आहे, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी ही गोष्ट अलिप्त आहे, सर्वप्रथम आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि शिवरायांची इतर कोणाशी तुलना हे कुठल्याही महाराष्ट्रातील शिवप्रेमीला न पटणारी आहे, त्यामुळे शिवप्रेमींची ही प्रतिक्रिया आहे, त्यातून जे घडलं ते निश्चितपणे प्रथा आणि परंपरेला साजेसं नाही, त्याची दुरुस्ती व्हावी लागेल, परंतु काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी अशा प्रकारचा वक्तव्य करणे हे म्हणजे महाराष्ट्राला आग लावण्यासारखा आहे, असं माझं मत आहे, असेही पुढे गणेश बिडकर यांनी म्हटलं आहे.
























