Hanuman Chalisa Row: हनुमान चालिसा आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईतील बोरिवली न्यायालयात हजार झाले. या प्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात आलं. यावेळी माध्यमाशी बोलताना रवी राणा म्हणाले आहेत की, ''आम्ही बेल बॉण्ड आज न्यायालयात सादर केले. आमच्यावर चुकीचे प्रकरण दाखल केल्याने आम्ही उच्च न्यायालयात जाणार. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. आम्हाला राजकीय सूडबुद्धीने त्रास दिला गेला. आम्हाला न्यायालयात जेव्हा बोलावणार आम्ही हजार राहू.''


या गोष्टी इथेच थांबणार नाही: नवनीत राणा 


यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या आहेत की, ''आम्ही न्यायालयात मतदारसंघांची सगळी कामे सोडून हजर आहोत. ज्या पद्धतीने आम्हाला फसवण्यात आलं. आम्ही घरी बसून हनुमान चालिसा वाचणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. राजद्रोह सारखा गुन्हा दाखल करण्यात आला, जो सर्वात मोठा गुन्हा आहे. 353 कलम लावणं, आम्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम केलं, असा गुन्हा आमच्याविरोधात दाखल करण्यात आला. तसेच 353 अ चा अर्थ समाजात तेढ निर्माण करणे आहे. या सर्व कलमांच्या अंतर्गत आमच्यावर जे गुन्हे दाखल केले. ज्यामुळे आम्हाला न्यायालयात बोलावलं, तर आम्ही हजर राहणार आहे. मात्र दुःख या गोष्टीच आहे की, आम्ही आमच्या मतदारसंघात जी कामे करणार आहे. ती सगळी कामे थांबली आहेत आणि तेही अशा गोष्टींसाठी जे आम्ही केलंच नाही. आम्ही हनुमान चालिसा वाचणार म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांची यंत्रणा आणि सत्तेचा दुरुपयोग करून हे सर्व गुन्हे दाखल केले.'' नवनीत राणा म्हणल्या की, या गोष्टी इथेच थांबणार नाही. या पुढे जाणार. आम्ही काहीच केलं नाही. काही केलेलं नसताना आमच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आम्हाला जेव्हा न्यायालय आदेश देणार त्या-त्यावेळी आम्ही न्यायालयात हजर होऊ.    


काय आहे प्रकरण? 


नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान मातोश्रीबाहेर 23 एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी आज ते न्यायालयात हजर झाले होते.