कणकवली, सिंधुदुर्ग : कोकणातील (Kokan) वैभव भाजपमध्ये जाणार की ठाकरेचं राहणार? हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे ठाकरेंचे कोकणातील आमदार वैभव नाईक. वैभव नाईक (Vaibhav Naik)  यांनी काल राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची गुप्त भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर दोघांनीही भेट घेतल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजपचे नेते रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आपली आणि वैभव नाईक यांची भेट होऊन भाजपमध्ये येण्यासंदर्भात तसेच राजकीय चर्चा झाल्याचं स्पष्ट केलं. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी कोकणात राणेंना विचारल्याशिवाय भाजपमध्ये कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचं देखील सांगितले. त्यामुळे कोकणातील वैभव ठाकरेचं की भाजपचं हे पाहणे महत्त्वाचे आहे.


अचूक टायमिंग साधलं जाईल का?


राणेना विचारल्याशिवाय आम्ही वैभव नाईक यांच्याबाबतीत कोणताही निर्णय घेणार नाही अशी प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. याचा अर्थ वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार वैभव नाईक ठाकरेंची साथ सोडणार हे जवळपास निश्चित? फक्त अचूक टायमिंग साधलं जाईल का? मात्र यात मुख्य बाब ही आहे की सध्या कुडाळ - मालवण या विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे आमदारकीची तयारी करत आहेत. त्यामुळे वैभव नाईक महायुतीत आल्यास त्यांना कुठे ऍडजेस्ट करायचं? हा प्रश्न उपस्थीत होतो. तर दुसरीकडे राजन साळवी यांना एसीबीची चौकशी सुरू आहे. कुटुंबीयांना देखील वारंवार चौकशीसाठी बोलावलं जात आहे. पण त्या तुलनेनं वैभव नाईक यांची एसीबी चौकशी सध्या तरी मागे पडल्याचे चित्र दिसून येतं? त्यामुळे याचा नेमका अर्थ काय? वैभव नाईक महायुतीत येण्यास उत्सुक असल्यानं त्याच्या मागील एसीबीचा सासेमिरा मागे तर पाडला नाही ना.


दसऱ्याच्या मुहूर्तावर माजी खासदार निलेश राणे यांनी राजकीय संन्यासाची केलेली घोषणा यामागे वैभव नाईक यांचा महायुतीतील प्रवेश होता का? त्याच कारणामुळे वैभव नाईक यांचा दसऱ्याच्या दिवशीचा शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेश रोखला गेला का? असे प्रश्न देखील उपस्थित होतात. त्यामुळे ठाकरेंचं कोकणातील वैभव महायुतीला मिळणार का? की ते वैभव ठाकरेच राहणार हा येणार काळच सागेल.


राजकारणात कोणी कुणाचे कायमचे शत्रू नसतात. रविंद्र चव्हाण आणि वैभव नाईक हे चांगले मित्र देखील आहेत. वैभव नाईक भाजप मध्ये गेले तर त्याच्या सोबत पदाधिकारी कार्यकर्ते जाणार नाहीत. ते ठाकरेंकडे राहणार आहेत. तसेच वैभव नाईक भाजप सोबत गेले तर त्यांना पराभवाची देखील भीती वाटत आहे. वैभव नाईक यांना जायचं असल्यास ते शिंदे गटात जातील, याआधी देखील वैभव नाईक एकनाथ शिंदे यांना अनेक वेळा भेटले आणि तश्या चर्चा देखील झाल्या आहेत. जेव्हा एखाद्या भागातील नेत्याला घ्यायचं असत तेव्हा तिथे असलेल्या नेत्याला विचारल्याशिवाय घेता येत नाही, त्यामुळे नारायण राणेंना विचारत घेतल्याशिवाय भाजप वैभव नाईक यांना घेणार नाहीत. मात्र वैभव नाईक पक्ष सोडून गेले तर त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला हे नक्की.


वैभव नाईक यांनी महायुतीत जाण्याच वृत्त फेटाळलं 


वैभव नाईक यांनी महायुतीत जाण्याच वृत्त फेटाळलं असून रवींद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य हे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्या अंतर्गत धुसपुसीमुळे बाहेर आलं असल्याचं म्हटलं आहे. विकास कामासाठी रवींद्र चव्हाण यांना भेटलो. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे भाजपला धडकी भरली असल्यामुळे भाजपचे नेते अशी वक्तव्य करत आहेत. भाजपला लोकसभेला उमेदवार मिळत नसल्याने त्यामुळे ते भ्रमिष्ट झाल्याची टीका देखील वैभव नाईक यांनी केली. उद्धव ठाकरे सोबत मी निष्ठावंत आहे, मला मंत्री पदाच्या ऑफर देऊन देखील मी गेली नाही. मी कोणताही भ्रष्टाचार केला नसला तरी देखील माझ्यामागे एसीबीचा ससेमिरा लावला मात्र मी भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे भाजपला मी चॅलेंज देतो की मी भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध करून दाखवा. भाजप माझ्याबद्दल जनतेत संभ्रम निर्माण करत आहे. भाजपचा जनाधार कमी होत असल्याने अश्या बातम्या प्रेरल्या जातात, असेही नाईक यांनी नमूद केले. 


कधीही गद्दारी करणार नाहीत, विनाक राऊतांना विश्वास 


वैभव नाईक हे निष्ठावंत असून ते कधीही गद्दारी करणार नाहीत. उद्धव ठाकरेंचे शिलेदार आहेत. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांचं त्यांना भाजपमध्ये घेण्याचं स्वप्न पाहत असणाऱ्यांचा भ्रमनिरास होईल. नारायण राणे यांना विश्वासात घेऊन वैभव नाईक तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nilesh Rane: दगडफेक होताच निलेश राणे तावातावाने गाडीतून उतरले, चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर नेमकं काय घडलं?