Uday Samant On Sanjay Raut : श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या (Shrikant Shinde Foundation) संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रावरुन आता राज्याच्या राजकारणात अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी देखील खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र डागले आहे.


मला संजय राऊत यांना विनंती करायची आहे की, त्यांनी अजून एक पत्र पंतप्रधानांना लिहले पाहिजे. त्यात त्यांनी 100 कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मागच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये कोणी घेतलं? अंबानींच्या घरापुढे जिलेटिनचे बॉम्ब ठेवायला कोणी सांगितले? जी खिचडी आपण करोना काळात रुग्णांना दिली होती, त्या खिचडीमध्ये जो भ्रष्टाचार झाला, तो कोणी केला? त्याच्यामध्ये कोण कोण होते? असे अनेक प्रश्न उपस्थित करत संजय राऊतांनी या चौकशीचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहले पाहिजे असा खोचक टोला उदय सामंतांनी लगावलाय. 


भ्रष्टाचाराच्या चौकशीचे पत्र लिहिण्याचे धाडस केले पाहिजे 


गेल्या काही काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला तो देखील उकरून काढला पाहिजे. त्यातील दोषींवर कारवाई केली पाहिजे. अशा आशयाचे पत्र संजय राऊत यांनी लिहाण्याचे धाडस केले पाहिजे. मात्र ते असे धाडस कधीही करणार नाही. श्रीकांत शिंदे फाउंडेशन वर जे नाहक आरोप केले गेलेले आहेत, त्या फाउंडेशनची त्यांनी आधी माहिती घेतली पाहिजे. धर्मादाय आयुक्ताकडून कायमस्वरूपी त्याची तपासणी होत असते. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर 25 हजारहून अधिक रुग्णांना मदत केली आहे. पाच हजार लहान मुलांच्या छिद्र असलेल्या हृदयाच्या शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. 100 ॲम्बुलन्स त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. असे कितीतरी लोकसेवेचे कार्य आज हे फाउंडेशन करत असताना असे बिनबुडाचे आरोप करणे योग्य नसल्याचे उदय सामंत म्हणाले. 


केवळ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव या आकसापोटी आरोप 


श्रीकांत शिंदे फाउंडेशन एवढे विधायक काम करत असेल तर फक्त त्यांचा आडनाव शिंदे आहे आणि ते केवळ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत या आकसा पोटी हे आरोप केले जात आहेत. मी उद्योग मंत्री होऊन आता 18-19 महिने झाले.मुख्यमंत्री कार्यालय सोडा पण उद्योग विभागातलं एखादं प्लॉटचं काम करा, असं सांगणारा फोन देखील डॉ. श्रीकांत शिंदेंचा मला आलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जरी असले तरी ते दुसऱ्याच्या खात्यामध्ये किंवा दुसऱ्याच्या विभागामध्ये हस्तक्षेप करत नसल्याचेही उदय सामंत म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या