Rashtrapatni Remark: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून माफी मागितली आहे. चौधरी यांच्या राष्ट्रीय पत्नी या विधानावरुन जोरदार वाद सुरु आहे. दरम्यान, त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून म्हटले आहे की, मी तुम्हाला विश्वासाने सांगत आहे की, माझी जीभ घसरल्यामुळे हे घडले आहे. मी माफी मागतो आणि तुम्हाला ती स्वीकारण्याची विनंती करतो."


अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये वाद सुरु आहेत. त्यांच्या विधानावरून आज संसदेत गदारोळ झाला आणि त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.



काय आहे प्रकरण?


चौधरी यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रपतींसाठी 'राष्ट्रीय पत्नी' हा शब्द वापरला होता. त्यांच्या तोंडून चुकून हा शब्द निघाल्याचे चौधरी यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले होते. त्याचवेळी भाजपने हा काँग्रेस नेत्याच्या वतीने राष्ट्रपतींचा जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याचे म्हटले आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशाची आणि राष्ट्रपतींची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली. यावरून गुरुवारी संसदेत जोरदार वाद झाला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी त्यांच्या नेत्यांना धमकावल्याचा आरोप भाजपने केला. हे दावे फेटाळून लावताना काँग्रेसने सोनिया गांधींचा घेराव करून भाजपने त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. अ


धीर रंजन चौधरी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केल्याचे सोनिया गांधी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. इराणी यांनी ट्वीट केले की, "भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना भेटण्याचे सौभाग्य मिळाले."


दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांनी याआधीही अनेक वाद ओढवून घेतले आहेत. आता तर कारण नसताना सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावरुन आयतं कोलीत हातात मिळालं. खरंतर राष्ट्रपती, राष्ट्रपत्नी असा अतार्किक संबंध जोडून शब्दच्छ करायची काही गरज नव्हती. राष्ट्रपती, सभापती, कुलपती असे शब्द वापरताना त्यातला पती हा अधिपती याच अर्थानं अपेक्षित असतो. पण अशी टीपण्णी करुन अधीर रंजन चौधरी यांनी सेल्फ गोल केला. एकीकडे आदिवासी महिलेला राष्ट्रपती भवनात पोहचवलं हा भाजपचा प्रचार सुरु असतानाच आता या समाजाचा अपमान काँग्रेसनं केला अशीही टीका सुरु झाली.