Sunetra Pawar : अजित पवारांकडे असलेली तीन खाती मिळाली, सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं का दिलं गेलं नाही? जाणून घ्या कारण
Sunetra Pawar : अजित पवारांकडे असलेली तीन खाती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आली आहेत. अर्थ व नियोजन खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही तीन खाती दिली. मात्र, अजित पवार यांच्याकडे असणारं अर्थ आणि नियोजन खातं सध्या सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं नाही. अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करतील. पुढील काळात अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील अशी माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांचा अर्थ खातं का दिलं गेलं नाही?
सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं का देण्यात आल नाही यासंदर्भातील नवी माहिती समोर आली आहे. सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रशासकीय अनुभवाची कमतरता आहे. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना लगेच अनुभव नसताना खातं देणं जिकिरीचे असू शकतं.
अजित पवार यांच्याकडून 2026-27 ची तयारी जवळपास पूर्ण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अशात, शेवटचा हात फिरवताना आणि बदल सुचवायचे असल्याने अडचणीचं गेलं असतं. यामुळं सध्या अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीसोबत समन्वय राखतच मुख्यमंत्र्यांकडे खातं ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, अर्थसंकल्पानंतर पुन्हा अर्थ व नियोजन खाते राष्ट्रवादी कांग्रेसकडेच राहणार असल्याची माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याकडे असलेल्या चार पैकी तीन खाती देण्यात आली आहेत. क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे असतील. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. म्हणजेच राज्याच्या 2026-27 चा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करतील, हे स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. पुढील काही दिवस त्या बारामतीत असतील, त्यानंतर मुंबईला येऊन त्या पदभार स्वीकारणार आहेत.























