Sarad Pawar Answer On Question To Alliance With BJP: मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. एकूण सात टप्प्यात निवडणुका पार पडणार असून आतापर्यंत पाच टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तसेच, महाराष्ट्रातील (Maharashtra Politics) सर्व टप्प्यांतील मतदानही (Voting) नुकतंच पार पडलंय. भाजपनं (BJP News) दिलेला 400 पारचा नारा आणि विरोधकांची इंडिया आघाडी (India Alliance) यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 4 जूनला येणाऱ्या निवडणूक निकालांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं एक महत्त्वाचं वक्तव्य समोर येतंय. लोकसभा निवडणुकीत भाजपला जर सत्तास्थापनेसाठी जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती अजिबातच करणार नसल्याचं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. 


महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 


भाजप बहुमताचा आकडा गाठणार? शरद पवार म्हणाले... 


शरद पवार म्हणाले की, "त्यांनी सुरुवातीला 400 पारचा नारा दिला, पुन्हा पुन्हा ते सांगत होते. त्यानंतर ते 390 वर आले, 350 वर आले... याचाच अर्थ तो ट्रेंड खाली येतोय आणि जे 400 पार असं बोलत होते, तेदेखील आता जरा जपून शब्द वापरायला लागलेत. त्यामुळे आता ट्रेंड असा दिसतोय की, त्यांचं बहुमत कमी होतंय. त्यामुळे मागची स्थिती आणि आजच्या स्थितीत काही सुधारणा नाही, सर्व काही तसंच आहे. त्यामुळे आताचा ट्रेंड भाजपच्या विरोधात आहे. महाविकास आघाडीच्या जागा महाराष्ट्रात वाढणार आहेत... मध्यप्रदेश, राजस्थानमध्येही काँग्रेसच्या जागा वाढतील. विशेषतः केजरीवालांचा पक्ष आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतोय, ते पाहिलं तर त्यांचा नंबर नक्की वाढेल. एकंदरीत संपूर्ण देशाचा विचार केला तर 400 पार तर सोडाच, पण सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा नंबर कुठपर्यंत ते गाठू शकतात, हे सांगणं तसं कठीण आहे. पण हे मात्र नक्की आहे की, त्यांचा नंबर खाली येतोय." 


...तर माझ्यासारखे काही लोक कशाचीही अपेक्षा न करता इतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील : शरद पवार 


जर भाजपला थोडेफार आकडे कमी पडले, तर असे कोणते पक्ष आहेत जे त्यांच्यासोबत जाणार नाहीत आणि मग अशा स्थितीत जसं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसारखा प्रयोग राष्ट्रीय पातळीवर दिसेल? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "भाजपसोबत कोणते पक्ष जातील, हे काही सांगता येत नाही. अशी परिस्थिती जर आली, तर माझ्यासारखे काही लोक कशाचीही अपेक्षा न करता इतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. आणि देशाला स्थिर सरकार देण्यासाठी जर संधी असेल, तर त्याचा पुरेपुर फायदा घेतील." 


युतीचा प्रश्नच येत नाही : शरद पवार 


एक चर्चा अशीही आहे की, जर भाजपला जागा कमी पडल्या तर ते पुन्हा ठाकरेंना साद घालू शकतात, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अजिबात शक्य नाही. अजिबात म्हणजे, अजिबातच शक्य नाही... उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाजपसोबत जाणार नाहीत नाहीत नाहीत... तसेच, पुढे बोलताना लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडल्या तरी युती करणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. भाजपची धोरणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अशा परिस्थितीत युतीचा प्रश्नच येत नाही, असं शरद पवार म्हणाले. वैयक्तिक संबंध आणि राजकीय निर्णय यात फरक असतो, असंही शरद पवार मुलाखतीत बोलताना म्हणाले आहेत. 


देशात आता अजिबात 'मोदी लाट' नाही : शरद पवार 


देशात आता लोकांना बदल हवाय, देशात आता अजिबातच मोदी लाट नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान, यापूर्वीही अनेकदा शरद पवारांनी देशात मोदी लाट नसल्याचं म्हटलं आहे. 


माझी इच्छा अन् प्रामाणिक प्रयत्नही असेल : शरद पवार 


लोकसभेप्रमाणेच विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढवणार? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "विधानसभेलाही महाविकास आघाडीनं एकत्रच लढावं अशी माझी इच्छा आहे. प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील. विधानसभेला 288 जागा आहेत, त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल. लोकसभेला 48 जागाच होत्या. माझा पक्ष आज लहान असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष आहे... असं असतानाही आम्ही लहान जागा घेतल्यात. आम्ही जास्त जागांची अपेक्षा केली नाही. जादा जागा घेण्याची आणि त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती, पण आपण तिघंजण एकत्र यायचं, त्यामुळे या तिघांमधील सामंजस्य राखलं गेलं पाहिजे. हे सूत्र आम्ही सर्वांनी पाळलं." 


महाराष्ट्रातील मतदान पूर्ण


महाराष्ट्रात शरद पवार यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत निवडणूक लढवली. हे तिन्ही पक्ष राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचाच भाग आहेत. महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा जागांवर मतदान संपलं असून आता संपूर्ण राज्याला 4 जूनच्या निकालाची प्रतिक्षा आहे.


महाराष्ट्रात महाविकास आघाडीच; शरद पवारांचा दावा


महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा शरद पवारांनी केला आहे. राज्यातील एनडीएला जनता धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. एनडीएमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा समावेश आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवारांनी साथ सोडून भाजपसोबत गाठ बांधली आहे. सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अशातच यावेळची लोकसभा निवडणूक ही काका-पुतण्यामधील प्रतिष्ठेची लढाई असल्याचं बोललं जातंय. सर्वाधिक चर्चा आहे ती, बारामतीच्या लोकसभा जागेची. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ही जागा लढवली होती. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या येथून खासदार असून त्याही रिंगणात आहेत. या जागेवर नणंद-भावजय यांच्यातील लढत राज्यातील हायव्होल्टेज लढत म्हणून पाहिली जात आहे.