सोलापूर : महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे, महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे, असं आपण नेहमीच ऐकतो. मात्र, गेल्या काही वर्षातील राजकारण पाहता महाराष्ट्राती राजकीय संस्कृती लयाला गेली आहे, राजकारणाचा चिखल झालाय, अशा संतप्त प्रतिक्रियाही उमटतात. मात्र, काही क्षण असे असतात जे पुन्हा एकदा महाराष्ट्राची  संस्कृती आणि भानविकतेचं दर्शन घडवतात. उजनी जलाशयात (Ujani) 6 जण बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झालं आहे. तर, इंदापूर व करमाळा परिसराशी संबंधित ही घटना असल्याने या क्षेत्रातील दोन्ही खासदार (member of parliment) आज सकाळीच घटनास्थळी पोहोचले. उजनी धरणात बोट बुडाल्ची माहिती मिळताच स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर, आज सकाळपासून इतर राजकीय नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. 


अपघातस्थळाची जागा अतिसय अरुंद व आतमध्ये दूरपर्यंत असल्याने चिखलवाटेतून मार्ग काढत घटनास्थळापर्यंत पोहोचणे दिव्यच होते. तरी देखील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सकाळीच घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. तर, कळाशी येथे भेट देण्यासाठी माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर हे देखील निघाले होते. खासदार निंबाळकर यांनीही लाईफ सेव्हींग जॅकेट परिधान करुन बोटीने शोधमोहिमेत सहभाग घेतला होता. तत्पूर्वी घटनास्थळावर पोहोचण्यासाठी कसे जावे याची माहिती घेत पुढे जात असतानाच समोरच त्यांना खासदार सुप्रिया सुळे दिसल्या. त्यावेळी, सुप्रिया सुळे यांनीच खासदार निंबाळकर यांना संबंधित घटनेची इतंभू माहिती दिली. नेमकी घटना कशी घडली, इथपासून ते घटनास्थळावर कसे पोहोचायचे हेही सांगितले. एवढ्यावर न थांबता त्यांनी आपल्या सोबतच्या एका सहकाऱ्यास खा. निंबाळकर यांच्यासमवेत रस्ता दाखवण्यासाठी पाठवले होते. गेल्या महिनाभरात एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी करणारे हे राजकीय विरोधक आज संवेदनशीलता जपत एकत्र आल्याचे पाहून ग्रामस्थांनाही बरे वाटले. 


निवडणुकांत ऐकमेकांवर टीका


भाजप नेते आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे नेहमीच बारामतीवर सडकून टीका करताना दिसतात. राजकारणात सुरुवातीपासून त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, अजित पवार महायुतीत आल्यावर निंबाळकर यांच्या टीकेच्या धनी खासदार सुप्रिया सुळे ह्याच राहिल्या आहेत. तर, सुप्रिया सुळेंनी देखील रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर निवडणूक काळात जोरदार टीका केल्याचं दिसून आलं. मात्र, अनावधानाने आज हे दोन्ही नेते समोरासमोर आले. त्यावेळी, या दोन्ही कट्टर विरोधी राजकारण्यांचे वैयक्तिक नातं हे किती दृढ आहे, याची प्रचिती उपस्थितांना आली. 


दु:खत प्रसंगात जपली संवेदनशीलता


खासदार निंबाळकर यांना उजनी जलाशयातील अवघड रस्ता समजून ते लवकर घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी सुळे यांनी मदत केली. यावेळी, दोघांमध्ये संबंधित घटनेवर प्रदीर्घ चर्चाही झाली. सुप्रिया सुळेंनी वाटेतील गाड्या बाजूला काढून त्यांना रस्ता द्यायला लावला, याशिवाय त्यांच्यासोबत आपला एक माणूस देऊन निंबाळकर याना घटनास्थळी पोहोचले. संवेदनशील घटनांमधून राजकीय नेत्यांचे असे वेगळे नातेही, या दु:खद प्रसंगातून जनतेसमोर आले. दरम्यान, सुप्रिया सुळेंनी केलेल्या मदतीसाठी खासदार निंबाळकर यांनीही हात जोडून त्यांचे आभार मानत मानले. राजकारणाचा चिखल झाल्याची टीका नेहमीच होत असते. मात्र, जनसेवेत आणि दु:खद प्रसंगात व्यक्तिगत हेवेदावे विसरुन झालेला हा एकोपा अनेकांच्या काळजात घर करुन गेला.