Sangli: माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना त्यांचं वादग्रस्त वक्तव्य चांगलंच महागात पडताना दिसतय.  बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानाला पळवून लावले, आपण का करू शकत नाही? असा वादग्रस्त सवाल त्यांनी शेतकरी संघटनेच्या एका कार्यक्रमात केला होता. दरम्यान या विधानावर भाजपने आक्षेप घेतला असून सांगलीतील भाजपने त्या नीता केळकर यांनी राजू शेट्टींच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसंच राजू शेट्टींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात येतेय. 


काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून लोकांनी काहीतरी शिकावं असं म्हणत राजू शेट्टींनी बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानाला पळवून लावले असेल तर आपण असं का करू शकत नाही, असा वादग्रस्त सवाल केला होता. या वक्तव्याने आता नववा वाद निर्माण होताना दिसत आहे. 


राजू शेट्टीच्या वक्तव्यावर देशद्राेहाचा गुन्हा


राजू शेट्टींनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.  सांगलीतील भाजपचा महिला नेत्या नीता केळकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे. राजू शेट्टींच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक होताना दिसत आहे..


काय म्हणाले राजू शेट्टी?


माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशपासून काहीतरी शिकावं, आपण आपल्या पंतप्रधानाला पळवून का लावू शकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. राजू शेट्टी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी सहविचार सभेत बोलत होते. शेतकरी सहविचार सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काही तरी शिकावं. जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाला पळवून लावले असेल तर आपण असं का करू शकत नाही.


आगामी विधानसभेत तिसरी आघाडी?


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीसाठी वंचितचे प्रकाश आंबेडकर, प्रहारचे बच्चू कडू आणि मराठा आरक्षणावर लढणारे मनोज जरांगे यांच्यासह शेतकरी चळवळीतील इतर पक्षांसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या संभाव्य आघाडीत रविकांत तुपकर आल्यासही आपली हरकत नसेल असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा:


शेट्टी म्हणाले आरोपांना भीक घालत नाही, तर तुपकर म्हणाले, डीपॉजिट जप्त झालेल्यांना गांभीर्यानं घेत नाही, राजू शेट्टी आणि तुपकर यांच्यात का बिनसलं?