मुंबई : भाजपने त्यांचे उमेदवार 2 महिने आधी घोषित केले, तसे शिवसेनेचे 15 उमेदवार आधी दिले असते तर निवडणुकीचं चित्र वेगळं असतं असं शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले. निवडून आलेल्या सर्वांचं अभिनंदन, पण अजितदादा महायुतीत थोडे उशिरा आले असते तरी चाललं असतं असा घरचा आहेर रामदास कदम यांनी दिला. शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात (Shivsena Vardhapan Din) ते बोलत होते. 


रामदास कदम  म्हणाले की, "शिंदेसाहेब, मी हात जोडून तुम्हाला सांगतो त्या भाजपला सांगा, जसे भाजपचे उमेदवार दोन महिने आधी दिले, तसे आमचे 15 उमेदवार पण दोन महिने आधी दिले असते तर आज चित्र वेगळे असते. मला 100 उमेदवार द्या, मी 90 उमेदवार जिंकून दाखवतो."


रामदास शिंदे महायुती आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले की, "फडणवीस साहेब धन्यवाद, पण अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते."


एकीकडे महायुतीच्या पराभवाला अजित पवारांना जबाबदार धरलं जात असताना, ते सोबत आल्याने भाजपला कमी मतं मिळाल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता शिंदे गटाच्या रामदास कमदांनीही अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. रामदास कदम यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागेल. 


काय म्हणाले रामदास कदम? 


आदित्यचे काय योगदान आहे, आमची मंत्रिपदे त्याला दिली. शिवसेनाप्रमुख असायचे तेव्हा मीटिंग व्हायची, नेत्यांना विश्वासात घेऊन पुढे जायचे. आता हा माणूस एकटाच सगळं बघतो. शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असं त्यांना वाटतं. शिवसेना यांचे गुलाम असल्याचं यांना वाटतंय.