रत्नागिरी : तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचंय, 84 होवो की 90 होवो हा म्हातारा काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय थांबत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फलटण येथील सभेत केले होते. आता शरद पवारांच्या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पलटवार केलाय.


रामदास कदमांची शरद पवारांवर टीका 


रामदास कदम म्हणाले की, शरद पवार यांनी शंभरी गाठावी. पण, 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं. तुम्ही अनेक पावसाळे पाहिलेत. तुमच्या हुशारीमुळेच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली. उध्दव ठाकरे काँग्रेसची साथ सोडायला तयार होते. शरद पवार यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली. बाळासाहेब हयात असताना जे शरद पवार यांना जमलं नाही ते शरद पवार यांनी आता करून दाखवलं, असा पलटवार त्यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.  


टोलमाफीचा निर्णय लोकाभिमुख


मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबत विचारले असता रामदास कदम म्हणाले की, टोलमाफीचा निर्णय लोकाभिमुख आहे. कोकणातली जनता सरकारवर आणखी खुश झाली आहे. लोकांचे हजारो रुपये वाचतील, असे निर्णय घेण्यासाठी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे त्यांनी म्हटले आहे.   


काँग्रेसच्या गरीबी हटाव घोषणेचं काय झालं?


काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत रामदास कदम मानले की, काँग्रेसच्या गरीबी हटाव घोषणेचं काय झालं? हे काँग्रेसने सांगावं. निवडणुका आल्या की फक्त वारेमाप घोषणा द्यायच्या आणि अंमलबजावणी शून्य, हे काँग्रेसचे हे  स्वातंत्र्यापासून धंदे आहेत. काँग्रेसच्या मनात होतं तर लाडकी बहीण योजना का सुरू केली नाही? ये पब्लिक है, सब जानती है, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 


राज्यात महायुती जवळपास 200 जागा जिंकेल


विधानसभा निवडणुकीबाबत रामदास कदम म्हणाले की, राज्यात महायुती जवळपास 200 जागा जिंकेल. लोकाभिमुख निर्णयाला महाराष्ट्राची जनता साथ देईल. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत आहेत. पण, त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. कोकणावर संकट आलं तेव्हा शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता कोकणात आला. पण, उद्धव आणि आदित्य ठाकरे फिरकलेदेखील नाहीत. एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यामुळे महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. लोकांचा विकास करायला निधी मिळाला. उद्धव ठाकरे दिल्लीत कशासाठी जातात ते त्यांनी सांगावे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


आणखी वाचा 


Sharad Pawar : 84 वर्षांचा होवो किंवा 90, हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : शरद पवार