जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) तर आता भाजपमध्ये येत आहेत, त्यानंतर रोहिणी खडसे (Rohini Khadse) भाजपमध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं मोठं वक्तव्य भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी केलं. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना भाजपमध्ये घेतलं जाईल असंही त्या म्हणाल्या. 


रोहिणी खडसे यांच्या राष्ट्रवादीत राहण्याच्या भूमिकेबाबत रक्षा खडसे म्हणाल्या की, रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्या महिला प्रदेशाध्यक्षा असून त्यांना शरद पवारांसोबत काम करण्याची इच्छा आहे. असं असलं तरी त्यांनी भाजपसोबत येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जास्तीत जास्त लोक भाजपकडे कसे वळविता येथील याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल. 


गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊनच खडसेंचा भाजप प्रवेश


एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत रक्षा खडसे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना विश्वासात घेऊन एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. राज्यातील नेत्यांची चर्चा करूनच एकनाथ खडसे भाजपा प्रवेश करणार आहेत. पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी जेवढे नेते भाजपमध्ये येतील, त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा फायदा होणार आहे. सध्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून मोदींचे नेतृत्व सर्वच नेत्यांनी मान्य केले आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येत आहेत. ते सोबत आल्याने त्याचाच फायदा होणार आहे.


कार्यकर्त्यांनी छोटे-मोठे वाद बाजूला ठेवून लक्ष्य प्राप्त तिकडे गेले पाहिजे, माझ्यासाठी कोणी काय केलं, मी कोणासाठी काय केलं यापेक्षा मोदींना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं रक्षा खडसे म्हणाल्या. 


निवडणुकीच्या काळात जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात


एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आली असून याचं भाजपशी कुठल्याही प्रकारचा राजकीय कनेक्शन नाही, निवडणुकीच्या काळात असे फेक कॉल हे येत असतात असं रक्षा खडसे म्हणाल्या. निवडणुकीच्या काळात तणाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे फेक कॉल लोक करत असतात, या फेक कॉलची चौकशी झाली पाहिजे असंही त्या म्हणाल्या. 


मी निवडून येणार आहे अशी मला अपेक्षा आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्य कसं देता येईल याकडे माझा कल असणार आहे असं रक्षा खडसे म्हणाल्या. 


देशाच्या विकासासाठी आम्ही मत मागतो


माझे प्रतिस्पर्धी श्रीराम पाटील यांनी तीन वेळा पक्ष बदल केला आहे. त्यांना त्यांचं अस्तित्व सिद्ध करायचं असून आम्हाला देशाचे अस्तित्व सिद्ध करायचा आहे. आम्ही समाज म्हणून मतं मागतनाही तर देशाच्या विकासासाठी मत मागत आहे. समाजावर न जाता समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. 


ही बातमी वाचा: