Pune News: पुणे : पिंपरीच्या (Pimpri Vidhan Sabha Constituency) जागेवरून महायुतीत (Mahayuti) तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या पिंपरी विधानसभेच्या जागेवर आरपीआयसह (RPI) भाजपचा (BJP) डोळा असल्याची माहिती मिळत आहे. पिंपरी विधानसभेत बारणेंना लीड मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चिंचवड आणि भोसरी प्रमाणेच पिंपरी विधानसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होणार आहे, हे आता जवळपास उघड आहे. 


लोकसभा निवडणुकांचं वारं शांत झाल्यानंतर आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं विधानसभेची तयारी सुरू केली आहे. अशातच आता पुन्हा विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. आपलं प्राबल्य असलेल्या आणि प्रतिष्ठेच्या मतदारसंघांसाठी पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. लोकसभेप्रमाणेच राज्यातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. अशातच महायुतीतच विधानसभेसाठी चढाओढ रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 


अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणाऱ्या पिंपरी विधानसभेवर आठवलेंच्या आरपीआयसह भाजपचा ही डोळा आहे. आरपीआयनं तर लोकसभेची पुनरावृत्ती करायची नसेल, तर महायुतीनं पिंपरी विधानसभा आम्हाला सोडावी सोडावी, असा इशारा देत आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरीवर दावा ठोकला आहे. तर मावळ लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंनी महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे पिंपरी विधानसभेत खासदार श्रीरंग बारणे यांना भाजपमुळं लीड मिळाल्याचा दावा केला. हा दाखला देत पिंपरी विधानसभेवर भाजपच्या अमित गोरखेंनी हक्क दाखवला आहे. हे पाहता अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मात्र, त्यांनीसुद्धा काहीही झालं तरी मीच लढणार, अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं चिंचवड आणि भोसरी प्रमाणेच पिंपरी विधानसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होणार हे उघड आहे.  


महायुतीनं विधानसभेत RPI ला दहा जागा द्याव्यात; आठवलेंच्या दाव्यानं महायुतीचा तिढा वाढणार


महायुतीत विधानसभा जागा वाटपाचा तिढा आणखीन वाढणार आहे. कारण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी विधानसभेसाठी दहा जागांवर दावा केला आहे. लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नाही, तरी आम्ही जोमानं काम केलं. महायुतीच्या निवडणूक आलेल्या सतरा खासदारांमध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत आम्हाला महायुतीनं आठ ते दहा जागा मिळाव्यात, असा दावा आठवलेंनी केला आहे. पुण्याच्या लोणावळ्यात खाजगी कार्यक्रमात बोलताना आठवलेंनी हे वक्तव्य केलं.