Prakash Ambedkar Lok Sabha Election 2024 : अकोला : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आज अकोल्याहून (Akola News) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भूमिका जाहीर करु शकतात. सोबतच महाविकास आघाडीपासून (Maha Vikas Aaghadi) काडीमोड घेण्याची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूमिका जाहीर करताना प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबद्दल नेमकं काय बोलणार? याची उत्सुकता आहे.


दुसरीकडे प्रकाश शेंडगेंचा ओबीसी मोर्चा, जरांगे यांना मानणारा गट आणि इतर काही छोटे पक्ष आणि संघटना आंबेडकरांसोबत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकर तिसरी आघाडी स्थापणार असल्याची चर्चा रंगली आहे. तिसऱ्या आघाडीत वंचित 29 जागा लढण्याची चिन्ह आहेत. 


प्रकाश आंबेडकरांनी माविआला दिलेलं अल्टीमेटम आज संपणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी संदर्भात काय निर्णय घेणार? हे आज स्पष्ट होईल. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा वंचित बहुजन आघाडी आणि डावे पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न आहे. कारण महाविकास आघाडीत सीपीएम दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) जागेसाठी आग्रही होते पण ती जागा न मिळाल्याने सीपीएममध्ये नाराजी आहे. सीपीएम पक्षाचे नेते आणि माजी आमदार जे पी गावित, नेते डी एल कराड यांनी वंचितच्या नेत्यांची भेट घेऊन युतीबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षाशी देखील वंचितची चर्चा सुरु आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर राज्यात तिसऱ्या आघाडीचं नेतृत्त्व करणार का असा सवाल विचारला जातोय. 


प्रकाश आंबेडकर अकोल्यातून रिंगणात


गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीविषयी चर्चा होती. ते नेमकं कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आज मात्र त्यांनी या चर्चेवर पडदा पाडला असून मी येत्या 27 मार्च रोजी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं त्यांनी सांगितलंय. तसेच, मी माझ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून अर्ज भरणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.


आम्ही साथ देत नाही, असं चित्र निर्माण केलं जातंय : प्रकाश आंबेडकर 


भाजपकडून इतर पक्षांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातोय. इतर पक्षांना कमजोर केल्यावरच आम्हाला विजयी होता येईल, असं भाजपला वाटत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही भाष्य केलं. मविआत 15 जागांचा तिढा संपलेला नाही. ते एकत्र लढणार आहेत की, स्वतंत्रपणे लढणार आहेत, हे अजूनही ठरलेलं नाही. काँग्रेस आणि शिवसेना गोंधळ घालत आहेत. तशा प्रकारचा गोंधळ आम्ही अद्याप घातलेला नाही. आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की तुमच्यातील 15 जागांचा वाद मिटवा. मात्र आम्हीच त्यांना साथ देत नाहीत, असं चित्र निर्माण केलं जात आहे. आमच्यातील 15 जागांचा वाद मिटलेला आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी द्यावी, असंही आंबेडकर म्हणाले होते.