Ajit Pawar Press Conference : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वाचाळवीरांना आवरावं असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. तसंच सत्ताधाऱ्यांमुळे राज्यातील पोलीस तणावाखाली असून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोपही अजित पवारा यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर विविध मुद्द्यांवरुन हल्लाबोल केला. 


पोलीस विभाग आणि प्रशासन तणावात काम करतंय
सत्ताधाऱ्यांमुळे पोलीस विभाग आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तणावाखाली काम करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तसंच मंत्रालयातील अधिकाऱ्यांन थेट सीएमओमधून आदेश येत असल्याचं त्यांनी म्हटलं. ते म्हणाले की, "शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून प्रशासनात म्हणावं तसं काम होताना दिसत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झालं आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर संपूर्ण राज्याचा लोड होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करुन 18 लोकांना मंत्रिमंडळात घेतलं. महाराष्ट्रातील पोलीस आणि प्रशासन देशातील सर्वोत्तम असल्याचं म्हटलं जातं. परंतु सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड दबावाखाली काम करत आहे. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरुन आदेश येतात आणि अन्याय होत असला तरी पोलीस बोलून दाखवतात की आमचा नाईलाज आहे, आमच्यावर प्रेशर आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. पोलीस विभाग आणि मंत्रलायतील सचिव दर्जाचे आणि इतर कर्मचारी तणावात काम करतात. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून थेट आदेश येतात. जनतेचा आजही पोलीस आणि प्रशासनावर विश्वास आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरु झालेली परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही."


'वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलंय'
सरकारमधील वाचाळवीरांना आवरा, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला. "मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचं चुकत असेल तर त्यांना सांगायला हवं. सध्या शिंदे गट आणि भाजपमध्ये वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलं आहे. काहीही बोलतात. प्रवक्त्यांनी काय बोलावं यात मी बोलणार नाही. पण ज्याप्रकारे मंत्रिमंडळातील लोक बोलतायत यामुळे मंत्रिमंडळाची प्रतिमा सुद्धा खराब होईल. लोक ऐकतात, पाहतात आणि लक्षात ठेवत असतात. तुम्ही आता सहज बोलायला सर्वसामान्य नागरिक नाहीत. राज्याचे प्रतिनिधी आहात. मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलीय. तुच्यावर जबाबदारी आहे. अब्दुल सत्तार माझ्या बहिणीला बोलले. विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हटलं पाहिजे. संविधान, कायदा, घटना, नियम याचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे," असं अजित पवार म्हणाले.


सरसकट सगळ्यांना सुरक्षा देण्याची काय गरज?
यावेळी अजित पवारांनी मंत्री, आमदार तसंच नगरसेवकांना मिळणाऱ्या सुरक्षेवरही बोट ठेवलं. ते म्हणाले की, अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान दिवसाढवळ्या गोळीबार होतो तर सरकार काय करत होतं, पोलीस यंत्रणा काय करते? ठाण्यात शिंदे-ठाकरे गटात राडा झाला. असा राडा चालणार नाही. यामुळे पोलिसांना या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतलं. मी माहिती मागवली आहे की किती जणांना वाय प्लस दर्जा आहे. त्यांना खरंच गरज आहे का? सरकारमधील काही जणांच्या ताफ्यात तीस तीस गाड्या देण्यात आल्या आहेत. पण हा टॅक्सच्या रुपाने जमा झालेला सरकारचा पैसा आहे. सरसकट सगळ्यांना सुरक्षा देण्याची काय गरज? काही माजी नगरसेवकांना देखील सुरक्षा दिली आहे. 


Mumbai Ajit Pawar PC FULL