जालना : देशातील दोन राज्यात झालेल्या निवडणुकांच्या निकालात भाजपला चांगलं यश मिळालं असून हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सत्ता काबिज करण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे, भाजप नेत्यांचा विश्वास वाढला असून हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुती व भाजपला मोठं यश मिळेल, असं भाजप नेते सांगत आहेत. त्यातच, हरियाणामध्ये (Hariyana) जाट समाजाविरुद्ध ओबीसी मतदान एकटवल्यामुळे भाजपचा तिथं विजय झाल्याचं मत नोंदविण्यात येत असल्यासंदर्भात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, कधी हिंदुत्व म्हणतात, कधी ओबीसी म्हणतात यांचे यांनाच कळत नाही. हरियाणा आणि महाराष्ट्रात तिकडे आणि इकडे फरक आहे, हरियाणात एखादा मराठा, एखादा जाट किंवा एखाद्या शेतकऱ्याने मतदान केलंच असेल ना, मतदान होऊन गेलं की हे असं बोलतात. हे उपकार फेडणारे लोकं आहेत, होऊ गेलं की दुसऱ्याचं नाव घेतात, असे म्हणत मनोज जरांगे यांनी हरियाणा व महाराष्ट्रातील राजकारण वेगळं असल्याचं म्हटलं.  


महाराष्ट्रातून आम्ही पण भाजपला 106 आमदार दिले होते, इकडचा प्रश्न वेगळा तिकडचा प्रश्न वेगळा आहे, इथे एकटा मराठा 50 ते 55 टक्के आहे. इथे एका मतदार संघात लाख-लाख मतदान आहे, असे म्हणत हरियाणातील निकालावर भाजपने जाऊ नये, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला दिला आहे. निवडून येताना आणणारा एक आणि नाव एकाचं घ्यायचं ही यांची सिस्टमच आहे, उपकाराची परतफेड करायची, हे एकदम खालच्या थराला जात आहेत. जो मोठे करतो त्यांच्याच नावाने हे खडे फोडतातय. यांना हिंदुत्वाने निवडून आणलं की ओबीसींनी निवडून आणलं की यांना बहुजनांनी निवडून आणलं काही ताळमेळ नाही. ज्यांनी निवडून आणलं, त्यांच्याविरुद्धच नाव हे सांगत आहेत 


एकही सीट राज्यात येऊ देणार नाही


इथलं वातावरण बिघडलंय, हरियाणातलं वातावरण इकडे जोडू नका, नाहीतर मुसंडी फुसंडी जमत नाही मराठ्यांनी फासा टाकला की गेलाच, इथं मराठ्यांची मुसंडी वेगळीच असते. मराठ्यांसोबत डोकं लावू नको, इथे आरक्षण द्यायचं बघ. फडणीससाहेब तुम्हाला डोकं आहे का? इथे प्रत्येक मतदारसंघात लाख लाख मतदान आहे, पूर्ण बुकटा वाजवून टाकू. तुमचं एकही सीट राज्यात निघू देणार नाही, तुम्ही निर्णय न घेता नुसती आचारसंहिता लावून दाखवा, तुमचे एकही सीट राज्यात निवडून येऊ देणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपला इशारा दिला आहे. 


आचारसंहिता लावा, मग सांगतो


मराठ्यांच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी केल्यास तुमचे शंभर टक्के सरकार येईल, इथं मराठ्यांच्या नादी लागून मराठ्यांच्या आयुष्याचं, समुदायाच्या भविष्याचं रक्त प्यायचं इथं चालबाजी चालणार नाही. मराठ्यांचा तुम्ही अवमान आणि अपमान करून त्यांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे, यांनी आमची खुन्नस धरली आहे, आमच्या उरावर बसून त्यांनी दुसऱ्याला आरक्षण दिले आहे आणि आम्हाला दिले नाही. त्यामुळे, आमचा प्रश्न न सोडता आचारसंहिता लावा मग मी तुम्हाला सांगतो, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. 


हेही वाचा


आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात