सिंधुदुर्ग : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 9 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, राज्यात गेल्या दोन दिवसांपासून या मुद्द्यावरुन राजकीय नेतेमंडळी आमने-सामने आली आहे. राजकोट किल्ल्यावर बुधवारी महाविकास आघाडीचे नेतेमंडळी आणि राणे पिता पुत्र एकत्र आल्यामुळे चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे आणि राणे पुत्र समोरासमोर आल्यामुळे तणाव वाढला होता. त्यावेळी, तेथे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्याही घटना घडल्या आहेत. याप्रकरणावरुन आता शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक झाला असून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी, सुषमा अंधारे यांनी नितेश राणे आणि पुतळा बनवणाऱ्या आपटेचा फोटो दाखवला. आता, नितेश राणे यांनी पलटवार करत, आपटेला आम्ही आपटणार असल्याचं म्हटलं आहे. 


सिंधुदुर्गमधील किल्ल्यावर उभारलेला शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा बनविणाऱ्या आपटे नावाच्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, आम्ही त्याला नक्की आपटणार, असे म्हणत नितेश राणेंनी (Nitesh Rane)पुतळा बनवणाऱ्या ठेकेदार आपटेला इशारा दिल आहे. विशाळगडावर हिरव्या चादरी टाकत आहेत, महाराजांच्या गड किल्ल्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या नेत्यांना विशाळगडवरील जिहाद्यांचे आतीक्रमने दिसली नाहीत का, असा सवालही नितेश रणेंनी विचारला आहे. नितेश राणे यांची आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) येथे रॅली काढण्यात आली आहे, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना इस्लामपूरचं नाव बदलणार असल्याचं म्हटलं. 


राजकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तीकार होता. तरीही त्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम कसे देण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यावरुन आज सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, समितीने पुतळा पाहिला होता का, समितीने पुतळ्याला हिरवा कंदील दाखवला होता का? समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर कोण ते विद्वान होते ज्याला पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल, जर परवानगी दिली नसेल तर तो पुतळा उभा का केला असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी, त्यांनी नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचे एकत्रित फोटोही दाखवले आहेत. त्यानंतर, नितेश राणेंनी पलटवर करताना आपटेला आम्ही आपटणार असल्याचं त्यांनी म्हटलं.


इस्लामपूरचं नाव आजपासून ईश्वरपूर


विशाळगडावर बुलडोझर घेऊन जाऊ आणि जिहाद्यांची आतिक्रमने काढून टाकू, आजपासून इस्लामपूर नव्हे तर ईश्वरपूरपूर म्हणा, जो म्हणत नाही त्याला पाकिस्तानमध्ये पाठवा, असेही नितेश राणे यांनी म्हटलं. त्यामुळे, एकाप्रकारे राणेंकडून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नामांतर  ईश्वरपूर असंच करण्यात आलं आहे.