Maharashtra Vidhan Sabha Election : नवी मुंबई : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून अंतर्गत सर्व्हे करण्यात आलं आहे. काँग्रेस पक्षानं केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसचं मोठा पक्ष राहणार आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला 85 जागा, शरद पवार गटाला 55 ते 60 जागा तर ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचा हा सर्व्हे आहे की, उद्धव ठाकरेंना इशारा आहे? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत. 


लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) राज्यातील सत्ताधारी महायुतीला (Mahayuti) मोठा दणका देत घवघवीत यश मिळवलं. अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे (Vidhan Sabha Elections 2024) वारे वाहू लागले आहेत. राज्यात लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) विरुद्ध महायुती असाच सामना रंगणार आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं अंतर्गत सर्व्हे करण्यात आलं आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून आला आहे. 


काँग्रेसचा सर्व्हे की उद्धव ठाकरेंना इशारा? 


काँग्रेसनं केलेलं अंतर्गत सर्वेक्षण म्हणजे, उद्धव ठाकरेंना इशारा असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. सतत मुख्यमंत्री पद मागणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसनं सर्वेक्षणातून उत्तर दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सर्वेक्षणातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळूनच मॅजिक फिगर गाठू शकतात, असा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री (Chief Minister) पदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 16 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना विधानसभा निवडणुकांपूर्वी (Vidha Sabha Election 2024) मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच, जे नाव जाहीर केलं जाईल, त्याला आपला पाठिंबा असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण ठाकरेंच्या या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं कोणतंही ठोस उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे किमान चार भिंतीच्या आड तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली होती. तसेच, पाडापाडीच्या राजकारणामुळे निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणं गरजेचं आहे, असंही ठाकरेंचं मत होतं. 


काँग्रेसच्या सर्व्हेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? 


काँग्रेस : 85 जागा
भाजप : 55 
राष्ट्रवादी शरद पवार गट : 55 ते 60 
शिवसेना : 24
राष्ट्रवादी अजित पवार  गट : 8 ते 9 
शिवसेना उद्दव ठाकरे गट : 32 ते 35 


मविआचं मुंबईतील विधानसभा जागांचं वाटप कुठं अडलं?


शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुंबईतील काही जागांवर रस्सीखेच सुरु असून दोन्ही पक्षाकडून मुंबईत अधिकाधिक जागा आपल्या पक्षाने लढाव्यात असा आग्रह आहे. ठाकरे गट  मुंबईत 20 ते 22 जागा लढवण्यावर ठाम असताना काँग्रेसने 18 जागांचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. त्याच 18 मध्ये काही जागा ठाकरे गटाने लढविण्याची तयारी केली आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा 7 जागांचा प्रस्ताव ठेवलाय. त्यामुळे प्रत्येकाला समाधानकारक जागा मेरिटनुसार मिळण्यासाठी काहीशी अडचण होणार आहे.