Nirmala Sitharaman Attacks Opposition : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर (Opposition) जोरदार हल्लाबोल केला आहे. "भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) वेगाने वाढत आहे परंतु विरोधकांना ते पचनी पडत नाही. संसदेत असे काही लोक आहेत जे देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर जळतात," असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. त्या आज (12 डिसेंबर) लोकसभेत (Lok Sabha) बोलत होत्या.


निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "संसदेतील काही लोक देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर जळतात हे अतिशय खेदजनक आहे. भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी आहे. प्रत्येका भारताच्या प्रगतीचा सर्वांना अभिमान असायला हवा, पण काही लोक त्याची खिल्ली उडवतात. भारतीय रुपया जगातील प्रत्येक चलनापेक्षा मजबूत आहे. डॉलर आणि रुपयामधील तफावत वाढू नये यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे."






अर्थमंत्र्यांकडून त्यांच्या 2019 मधील कांद्याच्या वक्तव्याचा संदर्भ


2019 मध्ये निर्मला सीतारमण यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये कांद्याच्या वाढत्या दरावर त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. यावर सीतारमण म्हणाल्या होत्या की, "मी जास्त कांदा खात नाही. मी ज्या कुटुंबातून येते त्यात कांदा नसल्यामुळे फारसा फरक पडत नाही." त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर बरेच मीम्स बनवले गेले होते. सीतारमण यांनी आज पुन्हा त्यांच्या कांद्याच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. "सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यावर ज्याप्रमाणे मीम्स बनवण्यात आले, त्याचप्रकारे आज देशाच्या अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवली जात आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा डंका जगभर वाजत आहे, पण काही लोकांना ही वस्तुस्थिती पचनी पडत नाही," असं सीतारमण म्हणाल्या.


'भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचं काहींना पचनी पडत नाही'


लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका सदस्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या की,  "2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये होती. परकीय चलन साठा (Fedex reserve) खूपच कमी झाला होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धानंतरही भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. पण काहींना हे पचनी पडत नाही. ते देशाची बदनामी करण्यात व्यस्त आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे.


इतर चलनांच्या तुलनेत रुपया मजबूत होतोय : सीतारमण


"जगातील इतर चलनांच्या तुलनेत रुपया मजबूत होत आहे. डॉलरची गोष्ट वेगळी आहे. यूएस फेडच्या धोरणांमुळे डॉलर मजबूत होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआयने हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली. मात्र पुन्हा एकदा परकीय चलनाचा साठा वाढू लागला आहे. देशात एफडीआय वाढत आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमधील 50 टक्के एफडीआय भारतात येत आहे. आकडे याची साक्ष देतात. ज्यांना शंका आहे, त्यांनी हे आकडे बघावेत," असा सल्ला सीतारमण यांनी विरोधकांना दिला.