Governor Letter to Amit Shah : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासह महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. राज्यपालांनी माफी मागावी, त्यांची पदावरुन पायउतार व्हावं अशी मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहिलं आहे. "महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही करु शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे," असं त्यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.


'महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करु शकत नाही'


राज्यपालांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केलं आहे. यात त्यांनी शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगड, सिंदखेडराजा यांसारख्या पवित्र स्थळांवरील प्रवासाचा दाखला दिला. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करु शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.


उद्धव ठाकरे यांना टोला


या पत्रात राज्यपालांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला आहे. "कोरोनाच्या काळात, जिथे अनेक मोठमोठ लोक आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतलं," असं राज्यपाल म्हणाले.


राज्यपालांनी पत्रात काय म्हटलं?






माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत होते. हे सारे आदर्श आहेत. पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात. याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो.


आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही. येथे कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही. आता जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, ते केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत.


कोरोनाच्या काळात, जेथे अनेक 'महनीय' आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर पुत्राला जन्म देणार्‍या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथेही गेलो. गेल्या 30 वर्षांत त्याठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. तेथे मी हवाई मार्गाने नाही, तर मोटारीने गेलो. माझ्या कथनाचा मतितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत.


आदरणीय अमितजी, आपण जाणताच की, 2016 मध्ये जेव्हा आपण हलदानी येथे होतात, तेव्हाच 2019 पासून कोणतीही निवडणूक लढणार नाही किंवा राजकीय पदांपासून दूर राहिन, अशी माझी इच्छा प्रदर्शित केली होती. परंतु मा. पंतप्रधान आणि आपल्यासारख्यांचा माझ्यावरील स्नेह आणि विश्वास पाहून मी महाराष्ट्रासारख्या महान राज्याचे राज्यपालपद स्वीकारले. माझ्याकडून कधी अनावधानाने चूक झालीच, तर तत्काळ खेद व्यक्त करणे किंवा क्षमायाचना करण्यास मी कधीच संकोच करीत नाही.


मुगल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करु शकत नाही.