Bhiwandi Lok Sabha Constituency : भिवंडी : राष्ट्रवादीचे (NCP) बाळ्या मामा (Suresh Gopinath Mhatre - Balya Mama) हे भाजपचे (BJP) कपिल पाटील (Kapil Patil) यांची बी टीम असल्याचा आरोप जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे (Nilesh Sambare) यांनी केला असून, काँग्रेस (Congress) संपवण्याची सुपारी शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली आहे, अशी टीकाही यावेळी निलेश सांबरे यांनी केली आहे. मी सुरुवातीपासून काँग्रेसी विचारांचा आहे, काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. 2013 पर्यंत जिल्हा जनरल सेक्रेटरी काम करत होतो आणि आज मी काँग्रेसचा सदस्य आहे, असं निलेश सांबरे यांनी सांगितलं.


भिवंडी लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार निलेश सांबरे म्हणाले की, "माझ्यावर आरोप करणारी भाजपची ए आणि बी टीम आहे. अगदी 15 दिवस अगोदरपर्यंत बाळ्या मामा कुठे होते, शिंदेंकडे होते. तर, कपिल पाटलांची बी टीम आहे. हे सगळं राष्ट्रवादीनं सुपारी घेऊन काँग्रेस संपवण्याचं काम केलेलं आहे. मी मुळचा काँग्रेसवासी आहे, विलासराव देशमुखांपर्यंत ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत अगदी सर्व ज्येष्ठ नेत्यांपर्यंत घरचे संबंध आहेत माझे. आजही मी काँग्रेसचा सदस्य आहे. मी एकाच पक्षाकडे निवडणूक लढवण्यासाठी तिकीटाची मागणी केली आहे. मतांसाठी नाहीतर मी भिवंडीच्या विकासासाठी सांगतोय. मला खासदार होण्यासाठी मी निवडणूक नाही लढवत... तर, इथल्या प्रत्येक मतदाराला खासदारासारख्या सुविधा मिळाव्यात... ज्या सुविधा कपिल पाटलांना मिळतायत, त्या सर्वांना मिळाव्यात यासाठी मी निवडणूक लढवतोय." 


"राजकारणी लोकं ही आपण फार मोठं असल्याचं भासवत असतात. कपिल पाटील मंत्री असल्यामुळे फार मोठे आहेत, बाळ्या मामा आठ पक्ष बदलून आला म्हणून ते फार मोठे आहेत, असं तुम्हाला वाटत असेल. पण तुमचा हा समज अत्यंत चुकीचा आहे. जे लोक आपल्या तालुक्याचे होत नाहीत, समाजाचे होत नाहीत, गावाचे होत नाही ते कुठचे मोठे आलेत. कपिल पाटील केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी या शहरासाठी, तालुक्यासाठी केंद्रीय विद्यालय आणायला हवं होतं, रेल्वे समस्या सोडवायला हव्या होत्या. येथील समस्या जितेंद्र आव्हाड नाही सुधरवणार, त्यांनी फक्त मुस्लिम मतांचा वापर केला असल्याची टीका केली आहे.", असं निलेश सांबरे म्हणाले. 


दरम्यान, भिवंडी लोकसभेतील जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना ग्रामीण भागापाठोपाठ भिवंडीसारख्या मिश्र वस्ती असलेल्या शहरातसुद्धा नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. शांतीनगर परिसरात अल्पसंख्यांक समाजाकडून निलेश सांबरे यांचं ठीकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केलं गेलं. शांतीनगर रहिमतपूर या भागांत संध्याकाळी उशिरा आयोजित केलेल्या चौकसभेत समाजवादी पक्ष, पिस पार्टी या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश करून निलेश सांबरे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. या सभेसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.