मुंबई: अभिनेता गोविंदा (Govinda) याने शिवसेनेच्या शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केल्यानंतर त्याच्यावर पहिला राजकीय वार राष्ट्रवादीतून करण्यात आला आहे. गोविंदाचे पिक्चर आता चालत नाहीत, एखादा चालणारा नट तरी शिंदेंनी घ्यायचा होता असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला जशास तसं उत्तर दिलं असून गोविंदा हा तुमच्यापेक्षा चांगला नट असल्याचं ते म्हणाले. 


काय म्हणाले जयंत पाटील? 


गोविंदांचे पिक्चर आता चालत नाहीत, त्याचा शेवटचा पिक्चर फ्लॉप गेला, त्यामुळे हे आता नवीन काहीतरी असं म्हणत एखादा चालणारा नट तरी घ्यायचा असा टोला जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.


जयंत पाटलांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गोविंदा हा जयंत पाटलांपेक्षा चांगला नट आहे ना, मग अजून काय पाहिजे, 


अमोल किर्तीकरांसमोर गोविंदाचे आव्हान


शिवसेना ठाकरे गटाने वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष होतं. शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांचे वय पाहता त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची माहिती आहे. 


अमोल किर्तीकर यांच्या विरोधात एखाद्या लोकप्रिय चेहऱ्याच्या शोधात महायुती होती. त्यासाठी आधी माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांनाही विचारण्यात आल्याची माहिती आहे. या दोघांनीही नकार दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गोविंदाला गळ घातल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गोविंदाने आता पक्षप्रवेश केल्यानंतर त्याला वायव्य मुंबईतून तिकीट मिळणार हे स्पष्ट झालंय. 


गोविंदा हा या आधीही राजकारणात होता. 2004 साली त्याने काँग्रेसच्या निवडणूक लढवली होती. त्यावेळी गोविंदाने भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. मात्र नंतरच्या काळात त्याने पुन्हा एकदा अभिनयाकडे मोर्चा वळवला होता. आता पुन्हा एकदा त्याने शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आहे. अमोल किर्तीकर यांच्या विरोधात गोविंदाला तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 


गोविंदाच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी एकनाथ शिंदे यांना मिश्कील टोला लगावल्याचं दिसतंय. त्याला मुख्यमंत्र्यांनीही जशास तसं उत्तर दिलं.


ही बातमी वाचा :