मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) वाद संपता संपत नाहीये. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. आंबेडकरांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलाच फटका बसणार आहे. तर दुसरीकडे आमची अजूनही प्रकाश आंबेडकरांशी चर्चा चालू आहे, अशी भूमिका मविआचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दावा केला. यावरच आता प्रकाश आंबेडकरांनी एक्सच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. राऊत खोटे बोलत आहेत, असं आंबेडकर म्हणालेत. 


मविआचा सावध पवित्रा, राऊत म्हणाले...


प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यानंतर आता महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षातर्फे स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. मतफुटी होऊन मविआचे अनेक उमेदवार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मविआच्या नेत्यांकडून सबुरीची भूमिका घेतली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत हेदेखील काळजीपूर्वक प्रतिक्रिया देत आहेत. प्रकाश आंबेडकर आणि आमचे विचार एकच आहेत. आमची त्यांच्याशी चर्चा चालू आहे, असे राऊतांकडून सांगितले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र 6 मार्चच्या बैठकीचा उल्लेख करत राऊतांवर सडकून टीका केली आहे.






प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले? 


प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यानंतर आता महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. "संजय राऊत आणखी किती खोटं बोलणार. तुमचे आणि आमचे विचार एक असतील तर मग आम्हाला तुम्ही बैठकीला का बोलवत नाही. 6 मार्च रोजी हॉटे फोर सिजन्समध्ये एक बैठक झाली. या बैठकीला तुम्ही आमच्या प्रतिनिधींना आमंत्रित का केलं नाही. आजदेखील एक बैठक आहे. या बैठकीलाही तुम्ही आम्हाला आमंत्रित केलेलं नाही. सिल्व्हर ओकच्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती, हे आम्हाला ठावूक आहे. तुम्ही माझ्याविरोधात अकोल्यात उमेदवार देण्याची भूमिका मांडली होती. हे खरं नाही का? तुम्ही एकीकडे युती करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे सांगताय. दुसरीकडे आम्हाला पाडण्याचे नियोजन करताय," अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.