Mumbai Pune Express Way: जे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालं, तेच अटल सेतूवरही घडू शकतं, मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, सुचवला उपाय
Mumbai Pune Express Way: अटल सेतूवर कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Mumbai Pune Express Way: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटात आडोशी बोगद्यानजीक झालेल्या गॅस टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा सेतू (अटल सेतू) वर भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विधान परिषदेतील शिवसेना (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अटल सेतूवर सक्षम आपत्कालीन यंत्रणा आणि हेलिपॅडसारख्या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी नार्वेकर यांनी पत्रात केली आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटातील आडोशी येथे 3 फेब्रुवारी रोजी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर अति-ज्वलनशील प्रोपोलिन गॅसचा टँकर उलटला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. तब्बल 36 तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या काळात वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेमुळे मुंबई–पुणे महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सक्षम नसल्याचे स्पष्टपणे समोर आले, असे नार्वेकर यांनी नमूद केले आहे.
Atal Setu: अटल सेतूवरील आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अटल सेतूवरील आपत्कालीन व्यवस्थेचा सखोल आढावा घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील शिवडी येथून नवी मुंबईतील न्हावा शेवाला जोडणाऱ्या अटल सेतूची एकूण लांबी 21.8 किलोमीटर असून, त्यापैकी 16.5 किलोमीटर भाग समुद्रावर तर 5.5 किलोमीटर भाग जमिनीवर आहे. हा सेतू 12 जानेवारी 2024 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
Atal Setu: हेलिपॅडसारख्या सुविधा उपलब्ध करणे गरजेचे
अटल सेतूमुळे मुंबई–नवी मुंबई प्रवासाचा कालावधी एका तासावरून अवघ्या 20 मिनिटांपर्यंत कमी झाला असून, त्यामुळे या पुलावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय, अटल सेतूच्या आसपास राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प सुरू असल्याने, येथे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठा अपघात, आग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे हे मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे अटल सेतूवर सुसज्ज आपत्कालीन यंत्रणा, तातडीची मदत व्यवस्था आणि हेलिपॅडसारख्या सुविधा उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
एक्सप्रेसवेवरील नुकत्याच झालेल्या टँकर अपघातामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. अशा घटना अटल सेतूवर घडल्यास समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी हेलिपॅड आणि आपत्कालीन व्यवस्थेची गरज आहे. या विषयावर माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचे लक्ष वेधण्यासाठी पत्र… pic.twitter.com/LAOdbknTVv
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 7, 2026
Atal Setu: अटल सेतूवर दुर्घटना घडली तर...
टँकर अपघाताच्या दिवशी आपण मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरून बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सांत्वनपर भेटीसाठी जात होतो, आणि त्या वेळी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले. अशीच घटना अटल सेतूवर घडल्यास भीषण परिणाम होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती






















