पिंपरी- चिंचवड : राज्यात झालेल्या सत्तांतराचा आणि वर्षभरात घडलेल्या घडामोडींचा मला फटका बसला, हे मान्य करावे लागेल, अशी  जाहीर कबुली मावळचे महायुतीचे नवनिर्वाचीत खासदार  श्रीरंग बारणेंनी (Shrirang Barne) यांनी केली आहे. नाव न घेता श्रीरंग बारणेंनी विजयानंतर अजित पवारांवर निशाणा साधला आहे.   ते एबीपी माझाशी बोलत होते.  बारणेंना गेल्या लोकसभेत 2 लाख 17 हजारांचे असणारे लीड यंदा 96 हजारांवर आलं. गेल्या वर्षभरात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळं हा फटका बसला का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


श्रीरंग बारणे म्हणाले,  निवडणुकीच्या निकालाचे चित्र पाहता संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळा ट्रेंड होता. मावळ लोकसभा मतदारसंघातील 6 लाख 96 हजार मतदारांनी मला मतदान दिले. मी 2019 च्या निवडणुकीमध्ये 7 लाख 21 हजार मत मिळवली होती. एकंदरित राज्याचे चित्र पाहता या मतदारसंघातील महायुतीचा कार्यकर्ता माझ्यासोबत राहिला. पिंपरी- चिंचवडमध्ये असणारा लाख ते दीड लाख मतदार आजही मला मतदान करतो, तो पक्ष पाहत नाही. 


कामाच्या जोरावर मी माझी  हॅट्रिक पूर्ण केली : श्रीरंग बारणे


48 लोकसभेतील मतदारांचा मूड बदलला आहे. शेवटी मतदार हा कोणाला बांधील नसतो. मतदार हा कामाला महत्त्व देतो आणि त्यांनाच निवडून देतो. पक्षाच्या जीवावर निवडणूक लढवली जात असताना राज्यातील सत्तातरांनंतर मतदारांनी वेगळा मार्ग अवलंबला हे मात्र नाकारता येणार नाही . मात्र माझ्या कामाच्या जोरावर मतदारांनी माझी हॅट्रिक पूर्ण केली आहे. 


माझे मतदार कायम माझ्यासोबत : श्रीरंग बारणे


सुरुवातीपासून सांगत होतो की, मावळ मतदारसंघातून मी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल. याचे कारण म्हणजे गेली 10 वर्षात मी जनतेशी थेट संपर्क ठेवून अनेक विकासकामे मी या मतदारसंघात केली आहे. त्यामुळेच मला विश्वास होता की, पुणे आणि रायगड जिल्हा जोडणारा ह मतदारसंघ माझ्या बाजूने कायम राहणार असल्याचा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे.  


श्रीरंग बारणेंच्या विजयाची हॅट्रिक


पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या तसेच दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढतीत श्रीरंग बारणेंच्या विजयाची हॅटट्रीक झाली असून 96 हजारांचं मताधिक्य घेऊन ते मावळमधून तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर खासदार बनले आहेत.  शिवसेना पक्षाला कायम साथ देणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. त्यामुळे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारास नाकारुन येथील जनतेने शिवसेनेच्य बाजुने कौल दिला. मात्र, यंदा प्रथमच येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता.राष्ट्रवादी काँग्रेसने येथे हवा तेवढा प्रचार केला नाही, किंवा तसा जोर लावला नाही, असा आक्षेप शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून घेण्यात आला होता.   तर, संजोग वाघेरे ऐन निवडणूक प्रचार कालावधीत अजित पवारांच्या पाया पडले होते, त्यामुळेही बारणेंच्या समर्थकांत वेगळीच चर्चा रंगली होती. 


हे ही वाचा :


श्रीरंग बारणेंची हॅटट्रीक; 96 हजारांचं मताधिक्य घेऊन मावळमधून तिसऱ्यांदा शिवसेनेचा खासदार