बीड : जिल्ह्यातील नारायण गडावर यंदा पहिल्यांदाच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाज बांधव नारायण गडावर मेळाव्यासाठी जमले आहेत. मनोज जरागे यांनी भाषणाची सुरुवात करतानाच अग बया बया बया.. असे म्हणत नारायण गडावर नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी असल्याचं म्हटलं. तसेच, मी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो, असेही ते म्हणाले. नारायणगडावरील (Narayangad) मेळाव्याला मैदान फुल्ल भरलं असून काही तासांपूर्वी बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी ते नारायणगड अशी  30 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. बीडकडे येणाऱ्या चारही मार्गावर चक्का जाम झाला असून नारायण गडावरील मैदान मेळाव्यासाठी आलेल्या गर्दीने फुलून गेलंय. मला खरंच वाटलं नव्हतं की, नजर फिरेल इथपर्यंत तुम्ही येताल. एकजण म्हणत होता, हाहहाहा 500 एकर असतंय का, पण, गर्दी पाहून त्यांचा कार्यक्रमच होईल. 


मीडियाच्या बांधवांनी जरा गर्दीकडे कॅमेरे फिरवावेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीवरुनच ओबीसीमधील काही नेत्यांना व राज्य सरकारला इशारा दिलाय. बीडच्या पाठीमागे सगळे रस्ते जाम आहेत, 500 एकर परिसरात सगळं मैदान भरलंय. मी तुमच्यासमोर आज नतमस्तक होतो, एवढी गर्दी पाहून, नजर जाईल तिथपर्यंत मराठ्यांचा समुद्रच आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटंलय. एका दु:खाकडून या समुदायाला सुखाकडे जायचंय. या समुदायाकडे संस्कार आहेत, ते संस्कार कधीही जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय या राज्यावरती समुद्रासारखा पसरलाय. पण, कधीच या मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही, प्रत्येकाला साथ देण्याचं काम या समुदायाने केलंय. या समुदायाने कधीच जातीवाद केला नाही, आणि जात त्यांना शिवलीदेखील नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे राज्यातील अस्तित्व यावर भाष्य केलं. 


राज्य सरकारने 14 महिन्यात एकही मागणी मान्य केली नाही, उभा राहिण्याचे दिवस जवळ आले आहेत, काहीही होऊ शकते वेळेवर काहीही ठरवलं तर त्यावर चालायचं, असे म्हणत मराठा समाजाला मनोज जरांगे यांनी तयारीला लागा, असे आदेशच दिले आहेत. तसेच, मराठा समाजाचा एवढा द्वेष का? आता 17 जाती घालताना गोरगरीब ओबीसींचा विचार का केला नाही. आधीच भरपूर असल्याने तुम्ही येऊ नका म्हणतात, तुम्ही काल मोठ्या 17 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या, आता तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?, असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. एकजण म्हणाला महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, मगच आरक्षण देतो. आता 17 जाती घालताना तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतले का?, असा सवाल करत नाव न घेता फडणवीसांवर टीका केली.


उखडून फेकावेच लागेल


तुमच्या मुलाचे मुडदे कोण पाडत आहे, तुम्ही कितीही आंदोलन करा, कितीही कोटीच्या संख्येने या, आम्ही तुमच्या छातीवर बसून त्यांचा निर्णय घेतला. तुम्हाला काय करायचं करून घ्या अशी त्यांनी खुन्नस दिली आहे, त्यामुळे उखडून फेकावेच लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 


हेही वाचा


Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मेळाव्याला किती गर्दी?; ड्रोनशूटचे फोटो पाहून उंचावतील भुवया