मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा नुकतेच अहमदनगरमध्ये पाडला. या सोहळ्यात स्टेजवर बसलेल्या नेत्यांकडून एकमेकांवर खोचक टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, पक्षात कुठं तरी अंतर्गत कलह तर सुरू नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षांतर्गत कलह शरद पवारांची (Sharad Pawar) डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. कारण, नगरमधील 25 व्या वर्धापनदिन सोहळ्यात रोहित पवार यांनी नाव न घेता थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर टीका केल्याचे दिसून येते. त्यानंतर, राज्यात चर्चा सुरू झाली ती पक्षांतर्गत सुरु असलेल्या कलहाची. त्यातच, रोहित पवार (Rohit Pawar) समर्थक आणि जयंत पाटील समर्थकही सोशल मीडियातून भिडल्याचं पाहायला मिळालं. 


रोहित पवार यांनी घेतलेली भूमिका ही नक्कीच नवीन नव्हती. कारण, लोकसभा निवड़णुका पार पडल्यानंतर रावेरच्या जागेवरुन रोहित पवार यांनी रोहिणी खडसेंना लक्ष करत आमच्याच पक्षातील लोकांनी काम केलं नसल्याची खंत फेसबूक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली होती. रावेर मतदारसंघात श्रीराम पाटील यांनी चांगली लढत दिली. मात्र, संघटनेकडून आवश्यक ती ताकद न मिळाल्यानं त्यांना यश आलं नाही. यासोबतच या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं नाही, असे रोहित पवार यांनी म्हटलं होतं. तर, जयंत पाटील यांच्याबाबत देखील रोहित पवारांच्याच जवळच्या कार्यकर्त्यांने पोस्ट करत आता त्यांना बदला अशी मागणी केली होती. ''निष्ठावान लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्यावर आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी. तसेच, सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष संघटना वाढवली पाहिजे, असेही लवांडे यांनी म्हटले होते.






जयंत पाटील समर्थकांचा पलटवार


लवांडे यांच्या ट्विटनंतर जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अॅड. भूषण राऊत यांनी नाव न घेता थेट रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. ''राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाहीये'', असे ट्विट राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या ट्विटचा रोख थेट रोहित पवारांवर असल्याचे दिसून येते. कारण, बारामती अॅग्रोच्या माध्यमातून रोहित पवार यांचा पोल्ट्रीचाही मोठा उद्योग आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील शितयुद्ध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. 


रोहित पवारांच्या भाषणार शरद पवारांची नाराजी


एबीपी माझाला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार रोहित पवार आणि रोहित पाटील यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली जावी अशी मागणी सातत्यानं कार्यकर्त्यांच्यावतीने केली जात होती. तसेच, याबाबत स्वतः शरद पवार यांनी देखील जयंत पाटील यांना रोहित पवार आणि रोहित पाटील यांना जबाबदारी देण्याबाबत सांगितलं होतं. परंतु, याबाबत जयंत पाटील यांनी टाळाटाळ केल्यामुळेच रोहित पवार नाराज असल्याची माहिती आहे. मागील अनेक दिवसांपासून मनात असणारी खदखद रोहित पवार यांनी थेट जाहीर सभेत व्यक्त केल्यानं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील ही बाब आवडली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. शरद पवार यांनी याबाबत सभा संपल्यानंतर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. दुसरीकडे जयंत पाटील यांनीही आपण पुढील दोन ते तीन महिने अध्यक्ष असून त्यानंतर संघटनेची जबाबदारी कुणाला द्यायची ती द्या, अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे. 


दरम्यान, एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अतंर्गत नाराजी पाहता आता शरद पवार काय निर्णय घेतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला परवडणारी नाही.