Vidhan Sabha Election 2024 : सांगली जिल्हा हा राजकारणातल्या दिग्गजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्याने वसंतदादा पाटलांच्या रुपाने महाराष्ट्राला चारवेळा मुख्यमंत्री दिला. तर पतंगराव कदम, राजारामबापू पाटील, आर आर पाटील यांच्यासह सांगलीतील अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राचं राजकारण गाजवलं. आताही जयंत पाटील (Jayant Patil) आणि विश्वजीत कदमांनी (Vishwajeet Kadam) राजकारणाची तीच री पुढे ओढलीय. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्या या जिल्ह्यातील यंदाचं राजकीय गणित मात्र बदललं आहे. मधल्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात काँग्रेसच्या विश्वजीत कदमांनी यंदा आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार हे स्पष्ट झालं आहे.


सांगली जिल्ह्यामध्ये एकूण आठ आमदार असून त्यामध्ये भाजप 2, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 2 आणि शिवसेना 1 असे आमदारांचे संख्याबळ होतं. यापैकी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालाचा विचार करता जिल्ह्यातील 8 पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी कांग्रेस-राष्ट्रवादीने एकदिलाने काम केले तर इथले चित्र काहीसे वेगळे बघायला मिळेल.


सांगली जिल्ह्यातील आमदारांची यादी (Sangli MLA List 2019) 



  • मिरज - सुरेश खाडे (भाजप) 

  • सांगली - सुधीर गाडगीळ (भाजप) 

  • पलूस कडेगाव - विश्वजीत कदम (काँग्रेस)

  • जत - विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)

  • खानापूर आटपाडी - रिक्त (शिवसेना अनिल बाबर-निधन) 

  • तासगाव -  सुमनताई पाटील (राष्ट्रवादी शरद पवार)

  • वाळवा - जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार)

  • शिराळा - मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी शरद पवार)


लोकसभेचं चित्र कसं होतं? (Sangli Lok Sabha Election Result 2024) 


- पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदमांचे वर्चस्व कायम असून त्यांनी विशाल पाटील यांना मोठं मताधिक्य दिलं. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिह देशमुख यांच्यासाठी हा चिंतेचा विषय ठरणार आहे. 


- तासगावमध्ये आर आर पाटील गटाने विशाल पाटील यांना 9 हजाराहून अधिक मताधिक्य दिलं. भाजपचे संजयकाका पाटील यांचा बालेकिल्ला असतानाही ते मागे पडले. 


- जत विधानसभेतून भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांची ताकद विशाल पाटील यांच्यामागे असतानाही भाजपच्या संजय पाटील यांना आघाडी मिळाली. 


- खानापूरमध्ये भाजपचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या गटाची छुपी मदत विशाल पाटील यांना मिळाल्याची चर्चा आहे. या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी विशाल पाटलांना मताधिक्य दिलं.


- सांगलीमध्ये भाजपचे सुधीर गाडगीळ हे आमदार असतानाही विशाल पाटलांना मताधिक्य मिळालं. तर मिरजमध्ये पालकमंत्री सुरेश खाडेंच्या मतदारसंघातही विशाल पाटलांना मोठं मताधिक्य मिळालं.


- वाळवा आणि शिराळामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने मताधिक्य घेतलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.


2019 सालच्या निवडणुकीत वंचितने मोठ्या प्रमाणात मतं घेतली होती, त्याचा फायदा भाजपला झाला होता. यंदा मात्र तसं काही घडलं नाही.


आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कशी स्थिती असेल? (Sangli Vidhan Sabha Election 2024) 


वाळवा- इस्लामपूर, जयंत पाटलांना घेरण्यासाठी भाजपची रणनीती (Walva Assembly Election)


वाळवा इस्लामपूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला. या ठिकाणी जयंत पाटलांना घेरण्यासाठी भाजपने विशेषत देवेंद्र फडणवीसांनी वेगळी रणनीती आखली आहे. त्यामुळे जयंत पाटलांविरोधात एकाच उमेदवार असेल यासाठी प्रयत्न सुरु आहे. गेल्या वेळी भाजपकडून लढलेले इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील या वेळीदेखील इच्छुक आहेत. तसेच शिंदे गटात असलेले गौरव नायकवडी हेदेखील या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सध्यातरी जयंत पाटलांचं पारडं जड असल्याचं चित्र आहे.


शिराळा - राष्ट्रवादी सध्यातरी वरचढ (Shirala Kadegaon Assembly Election)


शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मानसिंग नाईक हे आमदार आहेत. या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील 48 गावे येतात आणि यावर जयंत पाटलांचा मोठा प्रभाव आहे. या ठिकाणी भाजपकडून सत्यजीत देशमुख हे इच्छुक आहेत. तर सम्राट महाडीक यांनी देखील तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित नाही.


तासगाव- रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात (Tasgaon Assembly Election)


राज्यात सर्वाधिक लक्ष्यवेधी ठरणाऱ्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे तासगाव विधानसभा. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांनी नेतृत्व केलेल्या या मतदारसंघात आता त्यांच्या मुलाने, रोहित पाटलांनी शड्डू ठोकला आहे. शरद पवारांनी तासगाव विधानसभेसाठी रोहित पाटलांचं नाव घोषित केलं. या ठिकाणी भाजपकडून माजी खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र ऐनवेळी संजय पाटीलही निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. असं झालं तर तासगावची निवडणूक ही सर्वाधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. 


पलूस-कडेगावमध्ये विश्वजीत कदमांची बांधणी चांगली (Palus Kadegaon Assembly Election)


काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आमदार विश्वजीत कदमांचा मतदारसंघ म्हणजे पलूस कडेगाव. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्यानंतर विश्वजीत कदमांनी काम सुरू केलं आणि या मतदारसंघाची चांगली बांधणी केली. सहकारी संस्था, शिक्षण संस्था आणि त्यामाध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे विश्वजीत कदमांचा या ठिकाणी संपर्क मोठा आहे. 


भाजपकडून विश्वजीत कदमांच्या विरोधात संग्राम देशमुख निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी शक्यता आहे. या ठिकाणी शरद पवार गटाचे नेते अरूण लाड यांची जवळपास 30 हजार निर्णायक मतं असून ती विश्वजीत कदमांच्या पारड्यात पडतील. त्यामुळे विश्वजीत कदमांसाठी सध्या तरी परिस्थिती सकारात्मक असल्याचं चित्र आहे. 


जतमध्ये काँग्रेसचा धक्का बसणार? (Jat Assembly Election)


सांगली जिल्ह्यातील आठपैकी जत विधानसभा मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी भाजपला मताधिक्य मिळालं आहे. जतमधून काँग्रेसचे विक्रम सावंत हे आमदार आहेत. त्यामुळे यंदाही त्यांनाच संधी मिळणार हे निश्चित आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते माजी आमदार विलासराव जगताप हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. पण त्यांनी काँग्रेसच्या विशाल पाटलांना मदत केल्यामुळे भाजपकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. 


तसेच या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेटवर्कही चांगलं आहे. भाजपकडून आपल्याला तिकीट मिळावं यासाठी विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हेदेखील प्रयत्नात आहेत. 


सांगलीचा तिढा भाजप कसा सोडवणार? (Sangli Assembly Election)


सांगली विधानसभा मतदारसंघातून सुधीर गाडगीळ हे आमदार आहेत. गेल्या विधानसभेला ते केवळ 2000 मतांनी निवडून आले होते. पण यंदा ते निवडणूक लढवणार नाहीत अशीदेखील चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून पृथ्वीराज पवार हे उत्सुक आहेत. तर काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृ्थ्वीराज पाटील हे उत्सुक आहेत. 


सांगलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेटवर्कही मोठं आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाचं नाव अंतिम झालं नाहीच तर पुन्हा एकदा सुधीर गाडगीळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


वसंतदादा पाटलांच्या घराण्यातील अनेकांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलंय. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याच घरात राहावा यासाठी खासदार विशाल पाटलांचा प्रयत्न असेल. या ठिकाणाहून वसंतदादा घराण्यातील माजी आमदार मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या इच्छुक आहेत. काँग्रेसच्या तिकिटाचा निर्णय हा विश्वजीत कदम हेच घेण्याची शक्यता आहे.


खानापुरात कुणाला तिकीट? (Khanapur Assembly Election) 


जिल्ह्यातील हा एकमेव मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त असून या जागेवर शिंदे गटाचाच दावा असणार आहे. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनाच या ठिकाणाहून तिकिट मिळण्याची शक्यता आहे. तर अजितदादा गटाचे नेते वैभव पाटील या ठिकाणाहून इच्छुक आहेत. त्यांना जर महायुतीतून तिकीट मिळालं नाही तर ते वेगळा विचार करणार असल्याची चर्चा आहे.  तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर या ठिकाणाहूनही इच्छुक आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा मोठा प्रभाव आहे. 


मिरजमधून सुरेश खाडेंच्या विरोधात कोण? (Miraj Assembly Election 2024) 


मिरज हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असून या ठिकाणाहून भाजपचे मंत्री सुरेश खाडे निवडून येतात. यंदाही त्यांनाच संधी मिळणार आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यामुळे सुरेश खाडेंच्या विरोधात नेमका कोण उमेदवार असेल यावर इथल्या लढतीचं चित्र स्पष्ट होईल. 


महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीची शक्यता कमी


एकंदरीत सांगली जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे विश्वजीत कदमांचा शब्द अंतिम असेल. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीची शक्यता कमी आहे.


भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी, मतभेद होण्याची शक्यता 


दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र तिकिटासाठी मारामारी होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर सोडलं तर अजित पवारांचा गट नसल्याचं दिसतंय. तर भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मात्र जास्त आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमधील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आल्याचं दिसलं. त्यामुळे एकाला तिकीट दिलं तर दुसरा नाराज होण्याची शक्यता आहे. 


शेती हा कणा, पाण्याचा प्रश्न गंभीर


शेतीचा प्रश्न हा जिल्ह्याचा कणा. ऊस उत्पादक आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा हा जिल्हा. जिल्ह्यातील जवळपास 60 टक्के भाग दुष्काळी प्रदेशात मोडत असल्याने पाण्याचा प्रश्नही मोठा गंभीर आहे. मात्र शेतीचे प्रश्न आणि ताकारी, टेंभू, म्हैशाळ पाण्याच्या योजनेमध्ये ठाम अशी भूमिका न घेतल्याने भाजप लोकसभेच्या निवडणुकीत बॅकफूटवर गेल्याचं दिसलं. 


त्याचसोबत विमानतळाचा प्रलंबित प्रश्न आणि सांगली रेल्वे थांब्याचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. शहरातील रस्त्यांच्या झालेल्या चाळणीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक असल्याने कुणाचाही वचक राहिला नसल्याचं चित्र आहे.


आगामी विधानसभेच्या निवडणुकीत हे प्रश्न महत्त्वाचे असतील. ग्रामीण राजकारणाचा टच असलेल्या मतदारांशी जयंत पाटील आणि विश्वजीत कदमांचा थेट संपर्क आहे. या जोडगोळीला भाजपकडून कशा पद्धतीने उत्तर दिलं जातंय यावर जय-पराजयाचं गणित अवलंबून असेल.