Maharashtra Vidhan Sabha BJP मुंबई: आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजपकडून मुंबईसाठी (BJP Mumbai) विशेष प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सह प्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईकडे विशेष लक्ष देणार आहेत. मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघासाठी बैठका घेऊन भाजपकडून रणनीती ठरवण्यात येणार आहे. 


लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळालेले मतदार संघ आणि मताधिक्य न मिळालेले मतदारसंघ अशी वर्गवारी करून रणनीती ठरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून मुंबईतील प्रत्यके  विधानसभा मतदार संघाचा एक रिपोर्ट तयार करणार आहेत. हा रिपोर्ट केल्यानंतर मुंबईत कुणाला परत संधी द्यायची, कुणाच्या जागी नवा चेहरा द्यायचे हे ठरवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचा सर्वाधिक फटका मुंबईतल्या काही मतदार संघात बसला यामुळे जास्तीत जास्त हिंदू मतदारापर्यंत पोहोचून जनजागृती भाजपकडून करण्यात येणार आहे.


मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूनं-


यंदाची लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची होती. पक्षफुटीनंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशातच यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लीम समाजाच्या रूपानं नवा मतदार मिळाला आहे. याच मुस्लिम समाजाच्या मतदारामुळे ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी झाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. निवडणूक निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूनं ठामपणे उभे राहिल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं. 


उत्तर भारतीय भाजपपासून दुरावले-


उत्तर भारतीय भाजपपासून दुरावले आहेत, ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. शिवसेना हा एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लिम समाज शिवसेनेपासून दोन हात लांबच पाहायला मिळायचा. मात्र आता शिवसेना दोन गटांत विभागली असून ठाकरेंच्या शिवसेनेत हे समीकरण काहीसं बदलल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव यांच्या नव्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांनी भरभरुन पाठिंबा दिल्याचं यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. 


दलित, मुस्लिम बहुल धारावीतून ठाकरे यांच्यावर मतांचा वर्षाव- 


दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाकडून अनिल देसाईंना तिकीट देण्यात आलं होतं. यापूर्वी शिवसेनेचे राहुल शेवाळे या मतदारसंघातून दोन वेळा लोकसभा खासदार होते, तर यंदाही ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाच्या अनिल देसाईंनी मोठा विजय मिळवत विद्यमान खासदार राहुल शेवाळेंचा दारुण पराभव केला. दक्षिण मध्य मतदारसंघात असलेला अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात तसा शिंदेंचे उमेदवार राहुल शेवाळेंचा बोलबाला असल्याचं बोललं जात होतं. अणुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक असून, तिथून ठाकरेंचे शिलेदार अनिल देसाई यांना तब्बल 79 हजार 767 मतं मिळालीत. तर राहुल शेवाळे यांना 50 हजार 684 मतं मिळाली आहेत. तसेच, दलित आणि मुस्लिम बहुल धारावी विधानसभा मतदारसंघात अनिल देसाई यांना 76 हजार, 677 मतं, तर शेवाळे यांना 39 हजार 520 मतं मिळालीत. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा 53 हजार 384 मतांनी पराभव केला. 


संबंधित बातमी:


मुंबई, ठाणे ते रायगड, सिंधुदुर्गपर्यंत...; कोणाचं पारडं भारी?, विधानसभा निवडणुकीआधी सर्व आमदारांची यादी, एका क्लिकवर