Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गट भाजपात विलीन करा; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला, सामनाच्या रोखठोकमधून धक्कादायक दावा
Maharashtra Politics: सामनाच्या आजच्या 'रोखठोक'मधून खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे.

Maharashtra Politics मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या सामनाच्या आजच्या 'रोखठोक'मधून खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे. तुमचा पक्ष भाजपात विलीन करा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार देखील केल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
सामानाच्या रोखठोकमध्ये काय म्हटलंय?
वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेडमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत. छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली. आजही तशाच वतनांसाठी बेईमान दिल्लीत मुजरा झाडतात. उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला 'मराठा' जागा झाला. स्वाभिमानासाठी 'उठाव' केल्याची बोंब त्यांनी ठोकली. तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो. शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले. एकनाथ शिंदे हे शनिवारी, 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 'वेस्टइन' होटेलात ही भेट झाली. 57 आमदारांचा नेता अमित शहांच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता.
आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत-
"सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो. आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत, असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहांना भेटले. "बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा, केंद्राने हस्तक्षेप करावा" हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत. कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत. शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता. त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे. या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच.
अमित शहा - क्या शिंदेजी, सुबह के चार बज रहे है, इतना क्या अर्जेंट है?
शिंदे - आपको सब मालूम है, यहा क्या हो रहा है.
शहा - क्या हो रहा है?
शिंदे - माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरु आहेत.
शहा - ऐसा कैसा हो सकता है? मैं देवेंद्र से बात करता हूं.
शिंदे- मुझे दबाने की, खतम करने की पूरी कोशिश हो रही है. आप के भरोसे हम आपके साथ आये. आपका
वादा था, चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहूंगा.
शहा- हमारे 125 लोग चुनकर आये... तो आप कैसा क्लेम कर सकते हो?
शिंदे - मेरे नेतृत्व में चुनाव हुवा.
शहा- नहीं, मोदीजी के चेहरे पर चुनाव हुवा. आप को क्या चाहिये बोलो... मैं कोशिश करूंगा.
शिंदे - मुख्यमंत्री.
शहा - देखो भाई, वो ठीक नहीं है. अभी नहीं हो सकता, पार्टी का ही मुख्यमंत्री होगा.
शिदि - मैं क्या करूं?
शहा- आप बीजेपी में मर्ज हो जाओ. आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा. बाहर का आदमी अब महाराष्ट्र
का सीएम नहीं बनेगा. आपका रिस्पेक्ट हमने रखा है।
शिंदे - फिर हमारे पार्टी का क्या?
यावर "वो हमारे पे छोड़ दो. वो पार्टी हमनेही बनायी, आप चिंता मत करो." असे श्री. शहा यांनी सांगितले व ही पहाटेची बैठक संपवली. असे सांगणारे भाजपचेच लोक आहेत. महाराष्ट्राचे राजकारण हे अशा पद्धतीचे चालले आहे. प्रयागराजचा कुंभ संपला, पण महाराष्ट्राच्या राजकीय कुंभात पक्षांतराची चेंगराचेंगरी सुरूच आहे, असंही आजच्या सामनाच्या रोखठोकमधून दावा केला आहे. संजय राऊतांच्या या दाव्यावर आता शिवसेना शिंदे गटाकडून कोणती प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

























