हिंगोली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री (Chief Minister) पदाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग देखील लागत आहे. तर, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये देखील आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे सुद्धा केले जात आहे. अशात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील असाच काही दावा केला आहे. राज्यातील आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच (उबाठा) असेल, हीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची गॅरंटी असल्याचा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. सोमवारी हिंगोली (Hingoli) येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. 


आपल्या भाषणात बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्यात की, "आतापर्यंत ज्या लोकांवर भाजपने आरोप केला, त्याच लोकांना भाजपने संपल्या सोबत घेतेले आहे. आता मोदी की गॅरंटी म्हणत मत मागत आहेत. कसली मोदींची गॅरंटी, ज्यांच्यावर आरोप केला ते अजित पवार सोबत घेतले ती गॅरंटी, ईडी लावून लोकांना सोबत घेतले ती गॅरंटी आहे का? असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला. तर, चार महिन्यांनी आम्हीच आहोत ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची गॅरंटी आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि हिंगोलीची जागा आम्हीच लढणार ही गॅरंटी असल्याचं अंधारे म्हणाल्या. 


हिंगोली लोकसभेची जागा आम्हींच लढवणार


मराठवाड्यातील आठपैकी सात लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीत एकमत झाले असून, एकट्या हिंगोलीच्या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अशात हिंगोली लोकसभेची जागा आम्हींच लढवणार असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भर सभेत केल्याने स्थानिक राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील तीनही पक्षाने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. 


मोदींवर टीका...


पुढे बोलतांना अंधारे म्हणाल्यात की, "भाजपला हिंदू धर्माच तत्वज्ञान कळलं असत, तर पौष महिन्यात भाजपने राम मूर्ती प्रतिष्ठापणेची केली नसती. निवडणुकीच्या पूर्वी प्रतिष्ठापणा केली, अर्धवट मंदिरात प्रतिष्ठापणा केली जात नाही, पूजा सपत्नीक करावी लागते, यांनी कशी केली असे म्हणत अंधारे यांनी मोदींवर निशाणा साधला. 


हेमंत पाटलांवर टीका...


खासदार हेमंत पाटलांनी डॉक्टरला टॉयलेट साफ करायला सांगितले. आदिवासी समाजाच्या डॉक्टरला शौचालय साफ करायला लावलं. त्या हेमंत पाटलाला 2024 च्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल, असेही अंधारे म्हणाल्यात. 


भाजप ओबीसी-मराठा समाजात भांडण लावतोय...


जाणीवपूर्वक नितेश राणे सारखे पोरं चुकीचे वक्तव्य करू लागली. दंगली व्हाव्यात म्हणून प्रयत्न झालेत. पण, मुस्लिम भावंडांनी दंगल होऊ दिली नाही. त्यामुळे आता जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.


अजित पवारांसोबत भाजपच दोनदा लव्ह मॅरेज 


याचवेळी अंधारे यांनी अजित पवार आणि भाजपच्या युतीवरून देखील टीका केली. "अजित पवारांवर मोदींनी टीका केली. फडणवीस यांनी राष्ट्रवादीशी युती नाही असे म्हटले होते. पण यांनी दोनदा लव्ह  मॅरेज केले, एकदा पहाटे आणि एकदा दुपारी, असे म्हणता अंधारे यांनी हल्लाबोल केला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठवाड्यात लोकसभा जागावाटपावरून कुरघोडीचे राजकारण; महायुतीसह महाविकास आघाडीत निर्णय होईना?