मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकाचा निकाल आहे. मात्र निकालाच्या पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 


संजय राऊत म्हणाले की, 20 तारखेला मतदान आहे. 23 तारखेला निकाल आहे आणि 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचे आहे. खरं म्हणजे इतका कमी वेळ दिला जात नाही. महाविकास आघाडी निवडणूक जिंकणार आहे. 23 ला जर मतमोजणी आहे तर पूर्ण निकाल लागेपर्यंत 24 तारीख उजाडेल. 24 ते 26 नोव्हेंबर असा 48 तासांचा वेळ नवीन सरकार बनविण्यासाठी मिळणार आहे. पण हा वेळ पुरेसा नाही. 


अमित शाहांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं षडयंत्र


48 तासांत सरकार स्थापन करून शपथविधी करावा लागणार आहे. या काळात दोन्ही आघाड्यांना आपापल्या आमदारांना एकत्र करत बहुमत दाखवावे लागणार आहे. निकालानंतरच्या 48 तासांत सरकार बनले नाही तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही म्हणून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं अमित शाह यांचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. 


राष्ट्रपती शासन लावून राज्य करायचा डाव


महाराष्ट्रात घाईघाईने निवडणुका घेऊन भाजपा आपले मनसुबे पूर्ण करीत आहे. अमित शाहा व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आपण महाराष्ट्र गमावू याविषयी खात्री पटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जिंकली तरी त्यांना सरकार स्थापनेस पुरेसा वेळ मिळू नये. त्यानंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती शासन लावून राज्य करायचे असा एकंदरीत डाव दिसतो असेही संजय राऊत म्हणाले. 


भाजपकडून मतदार यादीत घोटाळा


ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकता याव्यात. त्यामुळे निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळा करत आहे. भारतीय जनता पक्ष ज्या मतदारसंघात लढणार आहे त्या साधारण दीडशे मतदारसंघाच्या यादीत महाविकास आघाडीच्या पक्क्या मतदारांची यादी काढायची आणि खोटे आधार कार्ड, खोटे ओळखपत्र या माध्यमातून दहा हजार बोगस नावे टाकले जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.


अमित शाह घोटाळ्याचे सूत्रधार 


लोकशाहीत हा सर्वात मोठा घोटाळा मतदार यादीचा माध्यमातून होत आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला अशाप्रकारे मदत करत असेल तर मला वाटतं की, या देशातील लोकशाहीची हत्या झाली आहे. अमित शाह हे या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. आम्ही मतदारांना जागरूक करू. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. निवडणूक आयोगावर चाल करून जाऊ, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 


आणखी वाचा


K P Patil meet Sanjay Raut: के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'