मुंबई : विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली असून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अद्यापही जागा वाटपावरून तिढा असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाने थेट उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे. मुंबईसह विदर्भ मिळून 12 जागा काँग्रेसला सोडण्यात याव्यात. जागावाटपाच्या चर्चेत या जागा कुणी लढवायच्या याचा अंतिम निर्णय झालेला नसतानाही या जागांवर शिवसेनेने उमेदवार जाहीर करणे योग्य नाही, अशा आशयाचा मजकूर या पत्रात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पत्रामुळे उद्धव ठाकरे नाराज झाल्याचेही समजते. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


संजय राऊत म्हणाले की, निवडणूक काळात असा पत्र व्यवहार होत असतो. आजकाल ई-मेलचा वापर होत असला तरी आपापसात असा पत्रव्यवहार होतो. नाराजी व्यक्त केली याचा अर्थ ते संन्यास घेऊन बाहेर गेले असा अर्थ होत नाही. नाना पटोले यांच्याशी माझा चांगला संवाद सुरू आहे. कालच त्यांची आणि माझी चर्चा झाली आहे. 


लेटरबॉम्ब हा औपचारिकपणा 


आम्ही एका जागेची अदलाबदल केली आहे. आत्ताच पाच मिनिटांपूर्वी देखील चर्चा झाली. लेटरबॉम्ब वगैरे हा औपचारिकपणा असतो. मीही जयंतरावांना अनेकदा पत्र पाठवतो. पत्र यासाठी पाठवायचे असते की, आपल्यासमोर चर्चा करण्यासाठी एक कागद राहतो. आता आमच्या सगळ्यांचे वय झाले आहे. कागद समोर असला की चर्चा होते, असे मिश्कील वक्तव्य त्यांनी यावेळी केले. 


संजय राऊतांचा सरन्यायाधीशांवर निशाणा 


महाविकास आघाडीतील नाराजी आता कागदावर समोर येत आहे. आगामी काळात पुरावे म्हणून हे वापरले जाऊ शकतात असे विचारले असतात संजय राऊत म्हणाले की, कोर्टात पुरावे चंद्रचूर यांच्यासमोर टिकत नाही. सरन्यायाधीश पुरावे मानायला तयार नाहीत. तर तुम्ही कोणत्या पुराव्याच्या गोष्टी करत आहात. अपात्रतेसंदर्भात पुरावे समोर असून देशाचे सरन्यायाधीश ते मानायला तयार नाहीत. शरद पवारांसारखा भक्कम पुरावा समोर असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना देतात, असा म्हणत त्यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला.


राहुल गांधींना चर्चा करायची असती तर...


महाविकास आघाडीत काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या नाहीत म्हणून राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांना मी ओळखतो. राहुल गांधींनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत काही भूमिका मांडली असेल तर त्याला मी नाराजी म्हणत नाही. तीनही प्रक्ष या महाराष्ट्रात तोलामोलाचे आहे. हे राहुल गांधींना माहित आहे. राहुल गांधींना चर्चा करायची असती तर त्यांनी आमच्या दोन्ही पक्षांची चर्चा केली असती. राहुल गांधी यांच्याबाबत बाहेर आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


आणखी वाचा 


...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरांतचा संताप