फलटण: माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे निर्माण झालेली नाराजी अद्याप कमी होताना दिसत नाही. अशातच आता रामराजे निंबाळकर यांनी माढा लोकसभेत रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी कोणतेही योगदान देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहेत. रामराजे निंबाळकर यांनी गुरुवारी फलटण येथील सभेत आपल्या कार्यकर्त्यांशी जाहीर संवाद साधला. यावेळी त्यांनी माढ्यातील एक खासदार पडला तर दिल्लीतील लोकांना काय फरक पडतोय, असे वक्तव्य करुन एकच खळबळ उडवून दिली.


देवेंद्र फडणवीस आणि माझे अतिश्य उत्कृष्ट संबंध आहेत. मी माढ्याबाबत त्यांना बैठकीत स्पष्टपणे सांगितले होते की, साहेब हे असं होणार आहे. हा उफाळून येणारा मतप्रवाह फलटणपुरता मर्यादित राहील, असे मला वाटत नाही. त्यावर फडणवीस मला म्हणाले की, रामराजे युतीधर्म आहे. तर अजितदादा यांनीही रामराजे, तुम्ही कार्यकर्त्यांशी बोला, त्यांन शांत करा, असे सांगितल्याचे रामराजे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 


सकाळी तलवार म्यान केल्याची चर्चा, पण संध्याकाळ होताच रामराजे निंबाळकरांचा पुन्हा एल्गार, माढ्याचा निखारा धगधगताच!


भाजपला तोच उमेदवार ठेवायचा असेल आमच्याकडून अपेक्षा ठेऊ नका: रामराजे निंबाळकर


माढा लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना रामराजे निंबाळकर यांनी म्हटले की, आज फक्त फलटणचा प्रश्न नाही. तर खटाव आणि माणचाही प्रश्न आहे. आता मी ठराविक लोक घेऊन अजितदादांन जाऊन भेटणार आहे. त्यांना स्पष्टपणे सांगणार आहे की, भाजपला इतक्या विरोधानंतरही उमेदवार कायम ठेवायचा असेल तर मतदान कमी झालं म्हणून आम्ही जबाबदार राहणार नाही. हे आपण अजितदादांना स्पष्टपणे सांगून येऊ. मग तुम्हाला करायचे ते करा. शेवटी देशभरात एकूण 542 खासदार आहेत. एखाद-दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलंय? पण यांना वाटतं की, आपण म्हणजे फार मोठे खासदार आहोत. यांच्याबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं? त्यांच्याबद्दल बोलून आता मला कंटाळा आला आहे, असे सांगत रामराजे निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टोला लगावला. 


नीरा देवघर प्रकल्पावरुन रामराजेंची टीका


या सभेत रामराजे निंबाळकर यांनी नीरा-देवघर प्रकल्पाबाबत भाष्य केले. मी नीरा-देवघर पुनर्वसनाबाबत रात्री तीन-तीन वाजेपर्यंत बैठका घेतल्या म्हणून 66 किलोमीटर लांब खंडाळ्यापर्यंत पाणी आलं. 2014 साली तांत्रिक कारणामुळे कालव्याच्या दुरुस्तीचे टेंडर निघू शकले नव्हते, ही कोणाची चूक आहे, असा सवाल रामराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला.


आणखी वाचा


प्लॅन होता बारामतीत 'हबकी' डाव टाकण्याचा; पण 'टांग' लागली माढा, मावळ, शिरुर, सातारपर्यंत?