विनाकारण कोणाला बदनाम करणे योग्य नाही, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकणावर जयंत पाटील यांचं मत
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपकडून वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतलं जात आहे.या प्रकरणार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव : ठाम पुरावा असल्याशिवाय असे कोणाचे नाव घेऊन शिंतोडे उडवणे योग्य नाही. मला खात्री आहे की अजून पोलिसांकडे असा कोणताही ठाम पुरावा नसेल. पुरावा असेल तर निश्चितच कारवाई होईल. ती कारवाई थांबवता येत नाही. त्यात संजय राठोड यांची बाजू घेण्याचे कारण नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मंत्री जयंत पाटील हे जळगावात आहेत. आज दुपारी जयंत पाटील यांनी सिंचन भवनात जलसंपदा व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, राज्यपालांची भूमिका तसेच मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मते मांडली.
संजय राठोड यांची पाठराखण? बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे. याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी मात्र, सावध प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ते राठोड यांची पाठराखण तर करत नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांकडे ठाम पुरावा नसेल. पुरावा असेल तर निश्चित कारवाई होईल. पण विनाकारण कोणाला बदनाम करणे योग्य नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यपालांना काढला चिमटा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमध्ये सध्या शीतयुद्ध रंगले आहे. या विषयावर बोलताना जयंत पाटलांनी राज्यपालांना चिमटा काढला. ते म्हणाले, राज्यपालांच्या भूमिकेबाबत महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासह अनेक राज्यपालांनी ही परंपरा निर्माण केली होती. राज्यपाल निवडताना ही परंपरा पाळली गेली आहे. आताचे राज्यपाल देखील ही परंपरा टिकवण्याचे काम करतील, अशी मला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर मत मांडणे टाळले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. विजय वडेट्टीवार नेमक्या कोणत्या प्रकरणासंदर्भात बोलले आहेत, याची मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे, याबाबत जयंत पाटील म्हणाले की, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचे संपूर्ण देशातील जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यात नवीन काहीही नसल्याची टीका त्यांनी केली.
Before You Go
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha






















