Voter ID Card : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. 7 मे रोजी राज्यातील 11 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे,  त्या पार्श्वभूमीवर डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदारांनी मतदार ओळखपत्र सादर करावेत. 


कोणते 12 पुरावेही धरले जातील ग्राह्य ?


छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. 


मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील 12 पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यावा, असे आवाहनही निवडणूक आयागोमार्फत करण्यात आले आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


लोकसभा सार्वत्रिक निवडणुका खुल्या, मुक्त, शांतता, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात होण्याच्यादृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिनांकास निर्धारित केलेल्या वेळेच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस (मद्यविक्री बंद) पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमित केले आहेत.


निवडणूक निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन निर्माणी अनुज्ञप्तीधारक बंदच्या कालावधीत उत्पादन करु शकतील. परंतु या कालावधीत कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. तसेच ठोक मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींनी कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना मद्याचा पुरवठा करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ व त्याअंतर्गत लोकप्रतिनिधीत्व अधिनियमन १९५१ अंतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.