SanjayBaba Ghatge: उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; माजी आमदार संजयबाबा घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार, कोल्हापुरात राजकीय भूकंप
SanjayBaba Ghatge: भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कागलमध्ये मेळावाही घेण्यात येणार आहे.

SanjayBaba Ghatge कोल्हापूर: कागलमधील शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) माजी आमदार संजयबाबा घाटगे (SanjayBaba Ghatge) आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संजयबाबा घाटगे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत कागलमध्ये मेळावाही घेण्यात येणार आहे. संजयबाबा घाटगे विधानसभा निवडणुकीपासून भाजपच्या संपर्कात होते. एकसंध शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे गट आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
कागल हा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय
कोल्हापुरातील कागल हा मतदारसंघाची राज्यभरात चर्चा असते. या मतदारसंघातून 1998 सालच्या निविडणुकीत घाटगे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पराभूत केले होते. त्यानंतर मात्र 1999, 2004, 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल पाच वेळा हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांना पराभूत केलं होतं. त्यांनी शिवसेना पक्षाकडून एकूण चार वेळा निवडणूक लढवलेली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी निवडणुक जिंकली. कागल हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. हसन मियालाल मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
2024 च्या विधानसभेत काय घडलं?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तगडा विरोध होऊन सुद्धा विजय खेचून आणला होता. हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचा 11 हजार 609 मतांनी पराभव करत पुन्हा एकदा विजय खेचून आणला. त्यामुळे हसन मुश्रीफ पुन्हा एकदा कागलच्या रणांगणामध्ये बाजीगर ठरले. हसन मुश्रीफ अजित पवार गटांमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच समरजितसिंह घाटगे यांना बळ दिलं होतं. त्यामुळे कागलची लढाई राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात चर्चेचा विषय झाला होता.
























