Maharashtra Politics नागपूर : विदर्भात काँग्रेसचा (Congress) एकही मुस्लिम आमदार नाही. राज्यसभेत राज्यातून काँग्रेसचा मुस्लिम खासदार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये ही काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. अशा स्थितीत मुस्लिम मतदार हे काय फक्त काँग्रेसला मतं देण्यासाठीच आहेत का? आम्हाला प्रतिनिधित्व मिळणार नाही का? असा संतप्त सवाल करत काँग्रेसच्या मायनॉरिटी सेलचे माजी अध्यक्ष आसिफ कुरेशी (Asif Qureshi) यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. ते नागपूर (Nagpur) येथे बोलत होते.


मग मुस्लिम मतदारांनी काय करावं? नुसतं काँग्रेसला मतदान करावं का?


नागपूरसह राज्यात मुस्लिमांमध्ये नाराजी वाढत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत मध्य नागपूरसह अकोला पश्चिम, बाळापूर आणि अमरावती या चार मतदारसंघात काँग्रेसने मुस्लिम उमेदवार द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे मायनॉरिटी सेलचे माजी अध्यक्ष ऍड. आसिफ कुरेशी यांनी केली आहे. आसिफ कुरेशी स्वतः मध्य नागपूर मधून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दरम्यान, एका बाजूला राहुल गांधी म्हणतात "जिसकी जितनी हिस्सेदारी, उसकी उतनी भागीदारी" दुसऱ्या बाजूला मुस्लिम उमेदवारांना काँग्रेस संधीच देत नाही. मग मुस्लिम मतदारांनी काय करावं? नुसतं काँग्रेसला मतदान करावं का? असा सवाल ही आसिफ कुरेशी यांनी विचारला आहे. त्यामुळे यावर  काँग्रेसमधील उच्च पदस्थ नेते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी


लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे . त्यातच नागपूर भाजपचे अध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे (Jitendra Kukde) यांनी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व 12 जागा भाजपच (BJP) लढवेल असा दावा केला होता. त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Group) स्थानिक पदाधिकाऱ्यांचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची नागपुरात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर भाजपच्या एकला चलोच्या धोरणाची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे ठरवण्यात आले. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलं नाही, जे आम्ही भाजपचा काम करू, आमचं पक्ष ठरवेल की आम्ही कोणाचं काम करणार, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार महायुतीत नव्या वादाचा कारण बनत असल्याचे चित्र आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या