मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangli Lok Sabha) महाविकास आघाडीकडून (MVA) उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर (Matoshree) जाऊन भेट घेतली. 


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ (Kolhapur Lok Sabha) महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढवणार असल्याचं निश्चित होत असताना, सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा दिला आहे.


चंद्रहार पाटलांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. अशात अनेक असे मतदारसंघ आहेत ज्यावर एकाचवेळी आघाडीतील दोन पक्षांकडून दावा केला जात असल्याने निर्णय होऊ शकत नाही. मात्र, काही मतदारसंघाबाबत निर्णय झाले असल्याची माहिती मिळत आहे. ज्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढवणार असल्याचे बोलले जात होते. पण याचवेळी सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा कुणाला सुटणार यावरून देखील चर्चा आहे. असे असतानाच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर, चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत देखील यावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. 


जिल्हानिहाय संयुक्त बैठका घेण्याचे आदेश...


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आघाडीतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध केले आहे. ज्यात म्हटले आहे की, "निवडणुकीचे रणशिंग आता फुंकले गेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संपूर्ण ताकदीने व मतभेद विसरून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रीत जिल्हानिहाय संयुक्त बैठक तातडीने घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण त्वरित एकमेकांमध्ये योग्य समन्वय साधून 7 मार्च पर्यंत आपल्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्य यावी.  तसेच 10 मार्चपर्यंत लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावयाची आहे. तरी नियोजित कालावधी लक्षात घेता बैठका घेऊन यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपापल्या पक्षप्रमुखांकडे देण्याचे" या पत्रात म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


काँग्रेसचं ठरलं! 'या' 22 मतदारसंघातून निवडणूक लढवणार, आजच्या बैठकीत अंतिम निर्णय?